नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन – सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय नंदुरबार तसेच जिल्ह्यातील धर्मादाय संस्था व जिल्हास्तरीय सामुहीक विवाह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ११ मे रोजी नंदुरबार येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड मध्ये सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छूकांनी मोठ्या संख्येने नाव नोंदणी करण्याचे आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुधीर वानखेडे यांनी केले आहे. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याबाबत माहिती देण्यासाठी नंदुरबार येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त सुधीर वानखेडे बोलत होते. ते म्हणाले की, पैसा, वेळ, अन्न आणि श्रम बचतीसाठी सामुहिक विवाह काळाची गरज बनली आहे. सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे या सर्व गोष्टींची बचत होणार आहे. अनेक गरीब, शेतकरी, शेतमजूर, आर्थिक दुर्बल घटकातील पालकांना आपल्या पाल्याचा विवाह पार पाडण्यासाठी दिव्य पार पाडावे लागते. बऱ्याचदा विवाह सोहळ्यासाठी शेतकरी कर्ज घेत असून निसर्गाच्या लहरीपणामुळे कर्जाची परतफेड करण्यात असमर्थ ठरला तर आत्महत्या करीत असल्याचे प्रकार घडतात. यामुळे सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय नंदुरबार तसेच जिल्ह्यातील धर्मादाय संस्था व जिल्हास्तरीय सामुहीक विवाह समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सदर उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत सर्व जाती धर्मातील इच्छूकांचे विवाह त्यांच्या वैयक्तिक रितीरिवाजानुसार लावण्यात येणार असून प्रत्येक जोडप्याला मंगळसूत्र, वधू-वर पोशाख व संसारोपयोगी भांडींचा संच तसेच वधू-वरांकडील वऱ्हाडींचे भोजन देण्यात येणार आहे. तसेच सर्व जोडप्यांना विवाहप्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. यासाठी दि.२ मे पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी विनामुल्य होणार असून यासाठी केवळ वयाचा दाखला, निवडणूक किंवा आधारकार्ड, संमतीपत्रक तसेच आंतरजातीय विवाह असल्यास वधू-वरांच्या माता-पित्यांचे संमतीपत्र आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यात तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून नाव नोंदणी करण्यात येणार आहे. नंदुरबार तालुक्यातील अशोक रामभाऊ पाटील, डॉ.सयाजी मोरे, राजेंद्र पाटील, सुलभा महिरे, मिस मार्टीना फरगोज, अनिल पाटील, बारकू पाटील, रवि गोसावी, एजाज बागवान, वासुदेव माळी, राजेश चौधरी, देविसिंग राजपूत यांच्याकडे नाव नोंदणी करता येणार आहे. तर शहादा तालुक्यात नोंदणीसाठी हैदरभाई नुराणी, तात्या पवार, अभिजित पाटील, हिरालाल माळी, ईश्वर माळी, रामचंद्र दशरथ पाटील, ॲड.पल्लवी प्रकाशकर आदींकडे नाव नोंदणी करता येणार आहे. नवापूर तालुक्यात राकेश शहा, रऊफ शेख, रेवा वसावे, कमलेश पाटील, सालमोन गावित, श्रीकांत पाठक, जितेंद्र वसावे तर तळोदा तालुक्यात अजय परदेशी, गोपाळराव बागुल, मित्तलकुमार टवाळे, किर्तीकुमार शाह, नवनित शिंदे, वाय.जे.खैरनार, रमेश मगरे तर धडगाव तालुक्यात हारसिंग पावरा, राजेंद्र सावळे, गोमता पावरा, विठ्ठल कदम, रमण भोई तर अक्कलकुवा तालुक्यात विश्वास मराठे, सुभाष सोनवणे, अनिल जावरे, रामसिंग वळवी, भगतसिंग पाडवी, राजेंद्र राणा आदींकडे नाव नोंदणीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन सुधीर वानखेडे यांनी केले.