नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – उपराजधानीचा स्मार्टसिटी म्हणून झपाट्याने विकास होत असला तरी कळमना स्थित वांजरा वस्तीतील नागरिकांचा कित्येक वर्षांपासून मूलभूत नागरी सुविधांसाठी संघर्ष सुरू आहे. सरकार म्हणून असणाऱ्या व्यवस्थेची २० वर्षांपासून या वस्तीकडे नजरच गेली नसल्याने येथील नागरिकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. आम्ही सगळे मजूर वर्गातील आहोत, पोटाची खळगी भरण्यासाठी राबराब राबतो. पण, स्वच्छ पाणी, वीज, रस्ते या प्राथमिक गरजातरी सरकारने पूर्तता करावी आणि इतरांप्रमाणे माणूस म्हणून आमचेही जगणे मान्य करावे, अशी भावनिक साद या परिसरातील नागरिकांनी घातली.
परिसरातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा गेल्या काही वर्षांत कधी मिळाल्या नाहीत. तसेच या भागात वास्तव्यास असणाऱ्या वस्त्यांना कधीही आजपयंर्त बारा महिने रस्ता सुरळीत उपलब्ध झाला नाही. तसेच आरोग्य केंद्र, पाणी सुविधा, वीज यासारख्या मूलभूत सुविधा व नागरी सुविधांपासून वंचित असल्याच्या तक्रारी येथील नागरिकांनी व्यक्त केल्या. सर्व नागरी सुविधा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत इथून पुढे कोणत्याही निवडणुकीला मतदान करणार नसल्याचा इशाराही यावेळी येथील नागरिकांनी दिला. या परिसरामध्ये दोन हजारांच्या घरात मतदार आहेत. सर्व नागरिक हे हातमजुरी करणार असल्याने सरकारशी भांडणे हे त्यांना फारसे कळत नाही. मात्र, संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क हे आपले सर्वात मोठे शस्त्र असल्याची जाणिव त्यांना आहे. म्हणून या लोकसभेमध्ये कुणाला मतदानच करायचे नाही असा निर्धारच येथील नागरिकांनी केला. नागरिकांना अनेक वेळा दूषित पाण्यामुळे रोगराईला सामोरे जावे लागते. पाण्याअभावी नागरिकांना डिसेंबर ते जून महिन्यापर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करावी लागते. अशा अनेक मागण्या प्रलंबित आहेत.