अहमदनगर : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रवादी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन भाजप मध्ये प्रवेश करण्यास सज्ज असलेल्या अकोलेचे आमदार वैभव पिचड यांना मतदारसंघातच झटका बसला आहे. अकोले तालुक्यातील आदीवासी बांधवांनी आमदार वैभव पिचडांविरोधात जनआक्रोश मोर्चा काढला असून त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आदिवासी बांधवांनी अकोले येथे आदिवासी नेते अशोक भांगरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. आदिवासींच्या जमीनी बळकावण्याचा आरोप पिचड यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून भाजपच्या प्रवेश करणार असलेल्या पिचड यांची डोकेदुखी वाढली आहे.
दुसऱ्या पत्नीचा आदिवासी असल्याचा दाखला खोटा
ज्येष्ठ नेते पिचड यांच्या दुसऱ्या पत्नी आणि आमदार वैभव पिचड यांच्या सावत्र आई कमल देशमुख पिचड यांचा आदिवासी असल्याचा दाखला खोटा मिळवला आहे. त्या मराठा समाजाच्या असूनही पिचड यांनी आपल्या राजकिय शक्तीचा वापर करत तो मिळवला असून त्याचा वापर करत तालुक्यातील आदिवासींची लूट केल्याचा आरोप भांगरे यांनी केला आहे. तसेच त्यांनी दुसऱ्या पत्नीच्या नावे आदिवासी असल्याचा दावा करत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बळकावल्याचा आरोप आहे. या कृत्याचा निषेध म्हणूनच अकोले येथे आज आंदोलन करण्यात आले असल्याचे सांगितले.
आजच आमदार पिचड यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला आहे. उद्या ते मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला खिंडार पडलं आहे. परंतु आता त्यांच्याच मतदारसंघात आदिवासी समाजाने काढलेल्या मोर्चामुळे चर्चांना उधाण आले आहे.