मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाले आहे . याच पार्श्ववभूमीवर आज नव्या सरकारची बहुमत चाचणी झाली. ठाकरे सरकारने विधिमंडळात विश्वासाचा ठराव जिंकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचं काही कार्यक्रमानिमित्त मुंबईत आगमन झालं. दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाचं कामकाज सुरू होताच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या शपथविधीला आक्षेप घेत प्रश्न उपस्थित केले होते. त्यावरून सभागृहात गोंधळी निर्माण झाला होता.
देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारवर नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. मात्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी फडणवीस यांचे सगळे आक्षेप फेटाळून लावले. ‘गोष्ट सभागृहाच्या बाहेर झाली त्यावर मी बोलणार नाही. शपथविधीचा विषय हा राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येतो आणि सभागृहाचं कामकाज हे घटनेनुसारच चाललं आहे,’ असं सांगत त्यांनी सगळे आरोप फेटाळून लावले. त्यानंतर भाजपच्या सर्व आमदारांनी सभात्याग करत बहिष्कार घातला.
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते पक्षाचे अध्यक्ष अमित शहांना भेटण्यासाठी गेले आहेत. ते राज्यातल्या घडामोडींची माहिती अमित शहांना देणार आहेत. आता अमित शहा त्यांना कुठला मंत्र देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. दुसरीकडे,विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रंगत निर्माण झाली आहे. भाजपने विधानसभा अध्यक्षपदासाठी किसन कथोरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोले यांना रिंगणात उतरवलं आहे. अध्यक्षपदाची निवडणूक उद्या होण्याची शक्यता आहे. नाना पटोले हे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नाना पटोले बाजी मारतात की भाजपचे किसन कथोरे धक्का देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Visit : bahujannama.com