पुणे : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना महामारीचे संकट मागिल वर्षभरापासून सुरू आहे. कोरोना महामारीने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रक्ताची नातीही पुढे येत नाहीत, ही बाब सर्वांनी जवळून बघितली आहे. मात्र, हडपसरमधील एका मुस्लिम युवकाने सामाजिक बांधिलकी जपत वर्षभरामध्ये एक हजार 200 कोरोनाग्रस्त मृतदेहांवर त्या त्या धर्मातील परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले. मेहबूब अब्दुल गफार शेख असे त्याचे नाव असून, त्याचे हे काम समाजाला प्रेरणादायी आहे.
मेहबूब शेख म्हणाले की, कोरोना महामारी आजाराच्या भीतीने मागिल वर्षभरापासून नागरिक सैरभर झाले आहेत. कोरोनाबाधित म्हटले तरी त्याच्याकडे समाज त्याला वाळीत टाकू लागला आहे. कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर मुलगा वडिलांना की वडिल मुलाला देहाग्नी द्यायला तयार नाही, अशी भयावह अवस्था निर्माण झाली. रक्ताची नाती दूर गेली. मात्र आजही समाजामध्ये मानवता धर्म शिल्लक आहे, जात-धर्म-पंथ न मानला नाही. कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम आजही त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.
हडपसरमधील सामाजिक परिवर्तन संस्था आणि पुण्यातील मूलनिवासी संस्थेच्या माध्यमातून मेहबूब अब्दुलगफार शेख, अंजुम इनामदार, साबिर सय्यद, आय.टी. शेख, सलिम शेख आणि त्यांच्या 18 सहकारी फेब्रुवारी 2020 पासून कोरोनाने मृत्यू झालेल्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन समाजातील मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करीत आहेत. एवढ्यावर ही मंडळी थांबली नाहीत तर एखादी व्यक्ती परगावची असेल, तर शासकीय परवानगीची पूर्तता करून त्यांच्या गावापर्यंत स्वखर्चाने पोहोचवत आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. एखादी व्यक्ती कोरोनाबाधित असेल तर तिच्याशी बोलायला कोणी तयार होत नाही, शेजारी-बाजारी, नातेवाईक दूर जाऊ लागले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, कोरोनासारखे आजार अनेक आजार आजपर्यंत आले आणि गेले, तरीसुद्धा मानवजात शिल्लक आहे. ही वस्तुस्थिती आहे, अशीही आठवण मेहबूब शेख यांनी करून दिली.
मागिल वर्षी इम्रान सय्यद (ता. नेवासा, जि. अहमदनगर) हा विद्यार्थी एमपीएससी परीक्षेची तयारी पुण्यात करीत होता. कोरोना कालावधीत त्याला उपचारासाठी ससूनमध्ये दाखल केले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबद इम्रान सय्यदच्या भावाने संपर्क करून मदत करता येईल का, असे विचारले. तेव्हा माझे मन हेलावून गेले. तातडीने शासकीय परवानग्या घेऊन स्वखर्चाने त्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्याच्या गावी पाठविला. मानवता म्हणून या कार्यामध्ये वाहून घेतले आहे. समाजामधील सर्व जातीधर्मातील मानवाने भरपूर काही दिले आणि शिकवले आहे, त्याची उतराई म्हणून काम करण्याचा वसा हाती घेतला आहे.
हडपसर (स.नं.57, काळेपडळ) येथील मस्लीम दफनभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ता नव्हता, तेथे दफन करण्यासाठी माती नव्हती, दफनभूमीला सीमाभिंत नव्हती, सुरक्षा रक्षक नव्हता, विद्युत व्यवस्था नव्हती, यासाठी नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे आणि संजयतात्या घुले यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांच्या माध्यमातून मुस्लिम समाजासाठीच्या दफनभूमीचा विकास केला. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, सुरक्षारक्षक या सुविधा संस्थेच्या माध्यमातून सुरू केल्या आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाचा किंवा रुग्णालयाकडून संदेश आला की, मी स्वतः घटनास्थळी तातडीने जातो. एकाचवेळी अनेक घटना असतील, तर सहकाऱ्यांना पाठवून मदतीचे काम सुरू केले जाते. मात्र, यावेळी मृत व्यक्तीचे रक्ताचे नातेवाईक दूर जातात, जवळसुद्धा येत नाहीत. तुम्हीच सर्व करा असे सांगून जबाबदारी झटकतात, हे पाहून नाती आहेत का, असा प्रश्न पडतो. कोरोना महामारीमध्ये उद्योगधंदे, कंपन्या, व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे रोजंदारीवर करणाऱ्यांची प्रचंड वाईट अवस्था झाली. पदपथ आणि रस्त्यावरील भिक्षेकरी आणि मजुरांना अन्नदान केले. तसेच गरजू कुटुंबवत्सलांना धान्याचे कीटरूपी मदत केली. आजही मानवतेच्या भावनेतून जेवढी शक्य आहे, तेवढी मदत गरजूंना करीत आहे. दरम्यान, माँ आंदोलन, महाराष्ट्र या संस्थेचे सचिव अॅड. सौ. अमिना मुजावर आणि कार्यकारी अध्यक्ष हाजी आर्किटेक्ट अझिम शेख यांच्या हस्ते आरोग्यसेवा योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.