शिक्रापूर : बहुजननामा ऑनलाईन – शिरूर तालुक्यातील राजकारणात नेहमी धांदल उडून देणारे राजकारणातील जादूगार समजले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल त्यांनी शिक्रापुर मधील शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटिल यांचे तोंडभरून कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम विभागाचे सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल हे नेहमीच चर्चेत असताना तर ते कधी कोणत्या पक्षात जातील याचा कोणालाही नेम नाही. आज पर्यंत त्यांनी अनेक निवडणुका वेगळ्या ताकतीने लढवून अनेक राजकीय नेत्यांना हादरे दिले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान ते स्वतः उमेदवार असल्याचे सांगत असताना अचानकपणे माघार घेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डाॕ अमोल कोल्हे यांचा प्रचार केला.तर शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात जोरदार टिका करत आढळराव पाटील यांना पराभूत करण्याची शपथ त्यांनी घेतली होती आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना विजयी करत खासदार आढळराव पाटील यांना पराभूत केले आणि त्यांचा शब्द खरा करून दाखविला. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या काही घडामोडीमुळे मंगलदास बांदल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली .त्यानंतर त्यांनी आपल्या हक्काच्या शिक्रापूर येथील एका कार्यक्रमात हजेरी लावत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे तोंड भरून कौतुक करत लोकसभा निवडणुकीदरम्यान माझ्याकडून चूक झाली आम्ही नवीन उमेदवार निवडून आणला परंतु ते मतदारसंघात दिसलेच नाही त्यामुळे तुम्ही माजी खासदार असून देखील आजीच आहात, जनता तुम्हालाच खासदार म्हणते आहे कारण आताचे खासदार हे मतदारसंघात दिसतच नाहीत अशी टीका देखील खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली, परंतु येथून पुढील काळात खासदार आढळराव पाटील यांना मदत करण्याचे त्यांनी यावेळी नमूद केले .
कार्यक्रमासाठी मंगलदास बांदल यांच्या पत्नी अपक्ष जिल्हा परिषद सदस्य रेखा बांदल या देखील उपस्थित होत्या. त्यामुळे अलीकडील काळात मंगलदास बांदल हे शिवसेनेमध्ये जातात की काय असा प्रश्न शिरूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील सर्व जनतेला पडला आहे. एकूणच काय तर मंगलदास बांदल यांनी आढळराव पाटील यांच्यावर केलेल्या कौतुकाचा वर्षावामुळे शिरुर तालुक्यात राजकीय चर्चांना मात्र उधाण आले