बहुजननामा ऑनलाईन टीम : राष्ट्रवादीचे बडे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा क्लीन चिट मिळाली आहे. सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर आज अजित पवार यांना या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी आज एसीबीकडून पूर्णपणे क्लीन चिट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात तसे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात एसीबीने न्यायालयाला अजित पवार निर्दोष असल्याचे सांगितले आहे.
याआधी महाराष्ट्र अँटी करप्शन ब्यूरो (एसीबी) ने सिंचन घोटाळ्या प्रकरणी अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात 27 नोव्हेंबरला एसीबीने प्रतिज्ञापत्र दाखल केले होते, ज्यात सांगण्यात आले की संस्थांच्या भ्रष्टाचारासाठी अजित पवार जबाबदार ठरवले जाऊ शकत नाही कारण त्यांचे त्यात कोणतेही कायदेशीर काम नव्हते.
त्यानंतर 7 डिसेंबरला अजित पवार यांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला होता. नागपूरनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्या प्रकरणी क्लीन चिट दिली होती. या प्रकल्पातील अनियमितेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली होती. कायदेशीर बाबी तपासण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची होती. त्यांनी ते केले नाही. त्यामुळे अजित पवार यांना कोणत्याही गैरव्यवहाराप्रकरणी जबाबदार धरता येणार नाही असे प्रतिज्ञापत्र अमरावतीचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागपूर खंडपीठात दाखल केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी पूर्णपणे क्लीन चिट देण्यात आली आहे.
Visit : bahujannama.com