जयपूर : वृत्तसंस्था – एका बलात्कार पीडीतीने पोलिसांच्या वागणुकीला कंटाळून पोलीस ठाण्यातच आत्मदहन केल्याची घटना समोर आली आहे. जयपूरमधील वैशालीनगर परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. या घटनेनंतर सदर महिलेला सवाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, एका 29 वर्षीय तरुणाने या महिलेवर दोन महिन्यांपूर्वी बलात्कार केला होता. यानंतर सदर महिलेने वैशालीनगर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली. तक्रार करूनही पोलिसांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. दोन महिने उलटूनही पोलिसांनी आरोपीला अटक केली नव्हती. इतकेच नाहीतर या प्रकरणी कसली चौकशीही झाली नव्हती असं या महिलेचं म्हणणं आहे. तिच्या पतीने अशी माहिती दिली आहे की, उलट पोलीस तक्रार मागे घेण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला रविवारी पोलीस ठाण्यात आली होती आणि आरोपीला अटक करण्याची तिने मागणी केली. यावेळी तिचा मुलगाही तिच्यासोबत होता. काही वेळानंतर तिने आत्मदहन केलं. पोलिसांनी तात्काळ तिला सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल केलं. याच रुग्णालयात उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. पोलिसांनी वाईट वागणूक दिली म्हणूनच तिने आत्मदहन केले असा आरोप तिच्या पतीने केला आहे. परंतु पोलिसांचं म्हणणं आहे की, आपण तर योग्य तपास करत होतो. पोलिसांनी याबाबत सांगितले की, “आम्हाला तपास करण्यासाठी वेळ लागत होता कारण आरोपी पुरुष हा त्या महिलेचा नातेवाईक होता. याशिवाय आम्हाला काही वेगळी माहिती मिळत होती.”