नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रेम विवाह केला म्हणून मुलीच्या घरच्यांनीच तिचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली असल्याचे समोर आले असून दिल्लीतील न्यू अशोक नगर येथील ही घटना आहे. खून झालेल्या मुलीचे नाव शीतल चौधरी असून तिचे वय २५ वर्ष होते. याप्रकरणी वडील रवींद्र, आई सुमन, काका संजय, ओम प्रकाश, मुलीचा आत्येभाऊ प्रवेश आणि जावयाला अटक केले आहे.
शेजारी राहणाऱ्या अंकितसोबत शीतलचे ३ वर्षांपासून प्रेमसंबंध असताना त्यांनी घरात न सांगता ऑक्टोबर २०१९ ला आर्य समाज मंदिरात जाऊन लग्न केले. हे लग्न तोडण्यासाठी तिच्या घरचे तिला जबरदस्ती करत होते. पण शीतलने ऐकले नाही म्हणून ३० जानेवारीला तिचा खून करून तिचा मृतदेह ८० किलोमीटर दूर एका नाल्यात फेकून दिला. पण शीतलच्या पतीने ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे केल्यामुळे हे प्रकरण समोर आले.
कारमध्ये नेण्यात आला मृत्तदेह
शीतलचा फोन लागत नसल्याने अंकितने स्थानीय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असताना पोलिसांनी कुटुंबाकडे चौकशी केली. तेव्हा कुटुंबाने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर शीतलचा शोध कुठेच लागला नाही म्हणून पोलिसांना शीतलच्या कुटुंबावरच संशय आला. त्यांनतर पोलिसांनी कुटुंबाच्या सदस्यांची स्वतंत्र चौकशी केली असता प्रत्येकाने आपला गुन्हा कबूल केला. त्यांनी शीतलचा मृतदेह एका पांढऱ्या रंगाच्या वॅगनर मध्ये ठेवून ८० किलोमीटर दूर असलेल्या एका नाल्यात फेकून दिला. ह्या गोष्टी चौकशी करताना समोर आल्या.