नवी दिल्ली : वृत्त संस्था – महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोदी सरकारने महत्त्वपुर्ण पाऊल उचलले आहे. रेल्वेत नऊ हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीमध्ये महिलांसाठी तब्बल 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत, रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी यांसंबंधित माहिती आपल्या ट्विटरवरून दिली आहे.
गोयल यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, ”रेल्वेत हवालदार आणि पोलिस उपनिरीक्षक पदांची भरती करण्यात येणार असून, यात महिलांना ५० टक्के स्थान देण्यात येणार आहे,’
गोयला यांनी रेल्वे भरती प्रक्रीया संबंधी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, ४ लाखांहून अधिक लोकांना रोजगार देण्याच्या निर्णयाची घोषणा यापुर्वी आम्ही केली होती. त्यानुसार २०१९ ते २०२१ पर्यंत १० टक्के आरक्षणांतर्गत रेल्वेत तब्बल २.८२ लाख पदांवर भरती प्रक्रीया राबवण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे ही गोयल यांनी सांगितले.
पुढील दोन वर्षांत ९९ हजार पदे रिकामी होणार आहेत. तसेच दोन वर्षात २.३ लाख पदांची भरती करण्यात येणार आहे. यातील १.३१ लाख पदांच्या नवीन भरतीचा पहिला टप्पा फेब्रुवारी-मार्च महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रीयेत महिला आरक्षणासोबतच अनुसूचित जाती-अनुसूचित जमाती आणि अन्य मागासवर्गीय पदांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले.