जामखेड : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या २९४ व्या जयंतीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यापार्श्वभूमीवर माहिती ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी चोंडी येथे आल्या होत्या. त्या म्हणाल्या की, राज्यातील गावागावात अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने बांधण्यात येणाऱ्या सभागृहांसाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद ग्रामविकास विभागाने केली आहे.
पुढे बोलताना मुंडे म्हणाल्या कि, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व जातिधर्माना घेऊन काम केले. दुष्काळाचा सामना करावा लागू नये म्हणून ठिकठिकाणी बारव बांधल्या. सर्व समाजासाठी धर्मशाळा उभ्या केल्या. त्यांचा आदर्श पुढे चालू ठेवण्याचे काम सर्वांनी करावे. तसेच त्यांनी निर्माण केलेल्या वाटेवरून चालणे आणि समाजाभिमुख काम करणे ही सर्वाची जबाबदारी आहे असेही मुंडे म्हणाल्या. आ. देशमुख यांनी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षिणक व राजकीयदृष्टय़ा मागास धनगर समाजोन्नतीसाठी सर्वांनी झटण्याची गरज व्यक्त केली. श्री. पडळकर यांनी धनगर समाजाच्या हक्काच्या मागण्यासाठी एकत्र येऊन मागण्यांचा पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. गणपतराव देशमुख होते. अण्णा डांगे, खा. महात्मे, श्री. पाचपुते आदींनी मनोगत व्यक्त केले. खा. छत्रपती संभाजीराजे, जलसंधारण तथा पालकमंत्री व कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राम शिंदे, खा. विकास महात्मे, माजी मंत्री अण्णा डांगे, आमदार सर्वश्री भीमराव धोंडे, अनिल गोटे, सुरेश धस, शिवाजीराव कर्डिले, आदी उपस्थित होते.