नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजप सरकारने लोकसभा निवडणुकीत ३०० जागा जिंकल्या म्हणजे आम्ही देशात मनमानी करू, असे पंतप्रधानांनी समजू नये. हे कदापि होणार नाही. भारतामध्ये मुस्लिमांचा हिस्सा हा बरोबरीचा आहे. आम्ही काही देशात भाडेकरू म्हणून राहत नाही, असे वक्तव्य एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. ते शुक्रवारी दिल्लीतील एका सभेत बोलत होते.
पुढे बोलताना ओवेसी म्हणाले कि, भारतीय राज्यघटनेचा हवाला देत मी पंतप्रधानांना इतकेच सांगू इच्छितो की, मुस्लिमांच्या न्याय हक्कासाठी तुमच्याशी लढत राहील. भारताच्या राज्यघटनेने (कलम २५ ते २८)आम्हाला आमच्या धर्माचे पालन करण्याची मुभा दिली आहे. जर देशाचे पंतप्रधान मंदिरात जाऊ शकतात, तर आह्माला देखील मशिदीत जाण्याचा हक्क आहे. आम्हाला हिंदुस्थानाला समृद्ध ठेवायचे आहे आणि आम्ही ते जरूर करु. मात्र, या देशात आमचा हिस्सा हा बरोबरीचा आहे. आम्ही काही भाडेकरू नाही, असेही ओवैसी यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वी ओवैसी यांनी योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर निशाणा साधला होता. त्यांनी तिसरे अपत्य जन्माला घालणाऱ्या जोडप्यांचा मतदानाचा हक्क काढून घ्यावा, असे रामदेव बाबा यांनी म्हटले होते. त्याला ओवैसी यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर देताना म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसरे अपत्य आहेत म्हणून त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेता कामा नये. असा रामदेवबाबांना टोला लगावला होता.