बहुजननामा ऑनलाइन टीम – मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे ७ नोव्हेंबरला पंढपूर ते मंत्रालय असा पायी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याचा महाविकास आघाडीने सरकारने चांगलाच धसका घेतला असून, जिल्हा प्रशासनाकडून विठ्ठल मंदिर, चौफाळा आणि महाद्वार या परिसरात २४ तासांकरता(24-hour) संचारबंदी लागू केली आहे. त्याचप्रमाणे पंढरपूरकडे येणारी व बाहेर जाणारी एसटीची वाहतूकही बंद(24-hour) ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीनंतर मराठा समाज आक्रमक झाला असून, मराठा समाजास आरक्षण द्यावे यासाठी मराठा क्रांती मोर्च्याकडून ठाकरे सरकारविरुद्ध शनिवारी (७ नोव्हेंबर) पासून पंढरपूर ते मंत्रालय असा आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे. या मोर्चासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो कार्यकर्ते सामील होणार आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मोर्चाच्या वेळेस कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता असल्याचे कारण सांगत शुक्रवार (६ नोव्हेंबर) रात्री १२ पासून शनिवार ( ७ नोव्हेंबर) रात्री १२ वाजेपर्यंत विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, नामदेव पायरी, महाद्वार, चौफाळा या परिसरात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी याकाळात शहरात दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना फिरण्यास बंदी करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तात्काळ काढला आहे.
दरम्यान, प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे मराठा समाजात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मराठा समाजाचा मोर्चा हाणून पाडण्यासाठी प्रशासनाने एसटीची वाहतूक बंद करुन संचारबंदी लागू केल्याचं आरोप मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या समन्वयकांनी केला आहे.