लातूर : बहुजननामा ऑनलाइन – मी देशद्रोही किंवा दहशतवादी नाही ; स्वतंत्र भारताचा, राज्यघटनेला मानणारा, बाबासाहेबांचा विचार सांगणारा सजग नागरिक आहे. पण माझा आवाज वारंवार दाबला जात आहे. मला बोलू दिले जात नाही. याचाच अर्थ देशात अघोषित आणीबाणी सुरू असून सरकारला आंबेडकरांचा विचार लोकांपर्यंत पोहोचू द्यायचा नाही, अशा शब्दांत भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद (रावण) यांनी सरकारवर तोफ डागली.
हे सरकार घाबरट असून ते संविधानाला घाबरत आहे, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली. युवा भीम सेनेच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी चंद्रशेखर आझाद लातुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना आझाद म्हणाले की, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. हा शाहु-फुले-आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचाच महाराष्ट्र आहे का ? असे म्हणण्याची वेळ आली आहे. मी तर आंबेडकर आणि बुद्धांचा विचार सांगण्यासाठी सभा घेत आहे. पण सरकारला आंबेडकरांचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू द्यायचा नाही.
त्यामुळे मुंबई, पुण्यापाठोपाठ लातुरातही मला बोलू दिले गेले नाही. आता अमरावतीत माझी सभा आहे. तेथेही अशीच स्थिती निर्माण होईल, याची मला खात्री आहे. हे सरकार घाबरट असून ते संविधानाला घाबरत आहे. माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकारने कितीही बंधने आणण्याचा प्रयत्न केला तरी माझे मनोबल किंचितही ढळणार नाही. पोलीसही सरकारच्या इशाऱ्यावर कारवाई करत आहे. सरकारला याचा जाब विचारण्यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ.सरकारला समाजात तेढ पसरवायचे असल्यामुळे धर्मा-धर्मात भांडणे लावणे, राम मंदिर, गोहत्या याभोवतीच हे सरकार फिरत आहे. पण याला उत्तर जनताच निवडणुकी मधून देईल, असे मत चंद्रशेखर आझाद यांनी यावेळी व्यक्त केले.