सातारा : बहुजननामा ऑनलाइन – खा. लक्ष्मणराव पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी प्रा. हरी नरके यांनी फेसबुकवर टाकलेल्या पोस्टचा जाहीर निषेध उपराकार लक्ष्मण माने यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
या पोस्टमध्ये माने यांनी अतिशय तिखट शब्दात निषेध केला असून काही अपशब्दांचाही वापर केला आहे.फेसबुक पोस्टमध्ये माने यांनी म्हटले आहे की, आपण किती नीच आहात हे एव्हाना महाराष्ट्राला समजले आहे.
मृत पावलेल्या व्यक्तीबद्दल असे वेडे वाकडे लिहीणे हे कोणत्या तुपातल्या संस्कृतीत बसते हे तुमचे तुम्हाला ठाऊक. तुम्ही किती गुण उधळलेत हे लक्ष्मणराव पाटलांना माहित नसतील काय? त्यांची बाजु मांडायला आज ते हयात नसताना इतक्या असहिष्णूपणे लिहिणाऱ्या महामूर्ख माणसास मुर्ख म्हणू नये तर काय म्हणावे. भुजबळांच्या मांडीवर बसुन तुम्ही काय काय मिळवले, किती लफडी केलीत, किती लटपटी-खटपटी केल्यात हे लिहीण्याची ही वेळ नाही. तात्यांच्या प्रेताला अजुन अग्नि द्यायचा आहे, तोपर्यंत सारे संकेत बाजुला गुंडाळुन ठेऊन गेलेल्या माणसाबद्दल अत्यंत संतापजनक लेखन केल्याबद्दल मी तुमचा तीव्र निषेध करतो. तात्यांनी सारी हयात गोरगरीब समाजातील शेतकरी कष्टकऱ्यांना बळ दिले. म्हणुन सातारा जिल्हातील साऱ्या जनतेने त्यांच्यावर अफाट प्रेम केले व त्यांना लोकसभेत तिन-तिनदा पाठवले.
यशवंतराव चव्हाण साहेबांनी घडवलेले हे नेतृत्व तुमच्याशी ज्या पद्धतीने वागले ते सभ्यतेनेच वागले त्यांनी तुमच्या आयुष्याची धुळधान केली नाही. तुम्ही मात्र ते गेल्यावरही लाथा झाडत आहात त्यामुळे तुम्हालाही लाथाच घातल्या पाहिजेत. विद्वत्तेचा आव आणल्याने कोणी विद्वान होत नाही. आणि तात्या फारसे शिकलेले नव्हते पण त्यांच नाते कष्टकऱ्यांशी होते. या प्रमादा बद्दल तुम्हाला तुमच्या सदाशिव पेठी भाषेत सांगायचे तर महात्मा फुल्यांच्या शेतकऱ्यांचा आसूड हाती घेऊन तुमची चांबडी लोळवायला पाहिजे, असे शब्द माने यांनी वापरले आहेत.