सातारा : बहुजननामा ऑनलाइन – अंत्यसंस्कारासाठी जाताना रस्ता वापरण्यास मनाई केल्याच्या कारणावरून लिंगायत समाजाने कराड-चिपळूण महामार्गावर रास्ता रोको केल्याची घटना मल्हारपेठ ता. पाटण येथे घडली. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. या घटनेची चर्चा परिसरात दिवसभर सुरू होती.
मल्हारपेठ ता. पाटण येथील लिंगायत समाजातील एका महिलेचा मृत्यू झाला होता. सदरचे घर हे कराड -चिपळूण महामार्गालगतच आहे. मृतदेह दफन करण्यासाठी समाजातील काही पुरूष मंडळी खड्डा काढण्यासाठी वाहनातून दफनभूमीकडे निघाली होती. मात्र वाटेवरून जाताना एका स्थानिक शेतकऱ्यांने विरोध केला. माझ्या खाजगी मालकीच्या क्षेत्रातून जाणाऱ्या या रस्त्यावरून वाहने नेल्याने माझ्या शेतीचे नुकसान होत आहे, त्यामुळे वाहने न नेता पायी जावे, असे त्या शेतकऱ्याने सांगितले.
हरी नरके यांच्या ‘त्या’ फेसबुक पोस्टचा लक्ष्मण माने यांच्याकडून निषेध
या कारणावरून लिंगायत समाज आक्रमक झाला. या समाजातील ज्येष्ठांसह महिला व युवकांनी आक्रमक भूमिका घेत या मार्गावर रस्त्याची कायमस्वरूपी सोय करण्यात आल्याशिवाय मृतदेह जागेवरून हलविणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे तणाव वाढला. तहसीलदार आल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही, असा पवित्रा समाजाने घेत कराड-चिपळूण महामार्ग रोखून धरला.गत अनेक वर्षापासून लिंगायत समाजाची दफनभूमी ही डोंगराकडील दरा नावाच्या शिवारात असून या ठिकाणी जाण्यास पायवाट आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा समाज दफनभूमीकडे जाण्यासाठी रस्ता व्हावा, या मागणीसाठी प्रयत्नशील आहे.
पावसाळ्यात एखादी व्यक्ती मृत झाल्यास अंत्यसंस्कारासाठी जाताना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्याने खाजगी क्षेत्रातून वाहने नेण्यास मनाई केल्याने लिंगायत समाजाने रास्ता रोको करून कायमस्वरूपी रस्त्याची मागणी केली. महिलांनी रस्त्यावरच बैठक मारली.