वर्धा : बहुजननामा ऑनलाइन – महिला सावित्रीच्या लेकी आहेत. त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढील वाटचाल करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष चारुलता टोकस यांनी केले.
त्या म्हणाल्या, आज महिलांना खंबीरपणे उभे राहणे आवश्यक झाले. सोबतच समाज सुधारणेचे कार्यदेखील आपल्याला करावयाचे आहे. घर सांभाळून हे कार्य करताना प्रत्येक महिलेला सावित्रीबाईंच्या आदर्शाची नितांत गरज असल्याचे त्या सांगत होत्या. ज्येष्ठ नागरिक सेवा महासंघाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती व महिला सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामभाऊ सातव होते. श्याम परसोडकर, सुरेश इरुटकर, प्रधान, गंगाधर पाटील, गिरपुंजे, चंद्रशेखर दंडारे, सुधाकर मेहरे, सुरेश बोरकर, वासुदेवराव वरहारे, गणपत मेहकरे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. सातव म्हणाले, समाज वाईट चालिरिती सोडायला तयार नाही. काही समाजांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. त्याकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमात डॉ. शिल्पा सातव यांनी पुरस्कारास प्राप्त ठरलेल्या महिलांचा परिचय करून दिला.
नलुबाई चौधरी, कल्पना लांडगे, मंगेशी मून, प्रणिती भुसारी, संगिता हिवसे, वर्षा नखाते, प्राजक्ता मुते, छाया पुडके, सिमा खडसे, अनुराधा उद्योगी, किरण पंधरे, पुष्पा शेंडे, सरोज उद्योगी, शारदा नासरे, अरुणा हिरुळकर, ज्योती खोब्रागडे, सुप्रिया मोहोड, मंदा डफ आदिंचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रल्हाद गिरपुंजे यांनी केले. संचालन हेमा शिंदे, तर आभार चंद्रशेखर दंडारे यांनी मानले. अनेकांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.