नागपूर : बहुजननाम ऑनलाईन-२० जानेवारीला नागपूर येथे होणाऱ्या विदर्भस्तरीय मेळाव्यात वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
२० जानेवारीला नागपूरमधील कस्तुरचंद पार्कमध्ये विदर्भस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान मेळाव्याच्या आयोजन बैठकीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले नागपूर येथे आले असता, पत्रकारांशी संवाद साधतांना ते म्हंटले २० जानेवारीला होणाऱ्या विदर्भस्तरीय मेळाव्यात पक्षातर्फे वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव मांडण्यात येईल सोबतच ग्रामीण भागातील भूमिहीनांना शेत जमीन मिळावी याकरिता झुडपी जंगलाच्या मुद्दाही याद्वारे पुढे रेटला जाणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर झुडपी जंगलाची जमीन भूमिहीनांच्या नावे होत नाही. विदर्भात झुडपी जंगलाची लाखो एकर जमीन आहे. ही जमीन हॉर्टिकल्चरसाठी उपलब्ध करून दिल्यास विदर्भाचे उत्पन्नही वाढून शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होईल. झुडपी जंगलाची जमीन शेतकऱ्यांना देण्याचा प्रस्ताव असून, सुधाकर नाईक मुख्यमंत्री असतांना यासाठी पक्षाने आंदोलनही केले. त्यावेळी ३. १५ लाख हेक्टर जमीन भूमिहीनांच्या नावे देण्यात आली. विदर्भात अशी ८ कोटी हेक्टर ( २० कोटी एकर ) जमीन आहे. यामुळे गरिबी हटून ग्रामीण लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
विशेष म्हणजे शहरात सर्वांनाच रोजगार मिळत नसून या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी ५ एकर जमीन उपलब्ध होईल. त्यामुळे झुडपी जंगलाची वजग नेमण्याची मागणीही त्यांनी केली. यावेळी भूपेश थुलकर, राजन वाघमारे, भीमराव बन्सोडे, बाळासाहेब हरडे, माजी आमदार अनिल गोंडाणे उपस्थित होते.