परभणी : बहुजननामा ऑनलाईन – ८४ हजार स्कंदांनी निर्मित त्रिपिटक ही उपासक व भिख्खूसाठी आचारसंहिता असून यातील विनय हे दोघांसाठी महत्वपूर्ण आहेत. तोच धम्माचा पाया असल्याचे प्रतिपादन बौध्द साहित्याचे अभ्यासक अतुल साळवे यांनी केले.
धम्म मैत्री संवाद अभियानांतर्गत १५ वे पुष्प त्रिरत्न बुध्द विहार तुळजाभवानीनगरात संपन्न झाले. यावेळी ‘बौध्द धम्माचा ऱ्हास व उदय’ या विषयावर साळवे बोलत होते. बौध्दाचार्य एम. एम. भरणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी यू. आर. शिवभगत होते. यावेळी भदंत धम्मपाल, अप्पर कोषागार अधिकारी ज्योती बगाटे, सायस मोडके, एम. एम. बरे, प्रा. वाय. आर. कुऱ्हाडे, प्रा. बाबजी बनसोडे, संजय बगाटे, समीर रोडे, सुदाम तुपसुंदर आदींची उपस्थिती होती.
अतुल साळवे म्हणाले, दु:खाचे उच्चाटन करण्यासाठी भगवान बुध्दांनी दिलेल्या उपदेशाप्रती श्रध्दा उत्पन्न आचारणातून धम्मधर होवून शिलाचरण केल्याने धम्माचा उदय होतो. बुध्दकालीन व सम्राट अशोककालिन भरलेल्या सहा संगिनी ह्या सिंहावलोकनासाठी होत्या. यामधूनच धम्म चळवळ गतिमान झाल्या होत्या, असे त्यांनी यावेळी सांगितले. अतुल वैराट यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी छाया पगारे, व्ही. बी. सूर्यवंशी, एन. बी. पगारे, रोहिदास गायकवाड, निवृत्ती उबाळे यांनी पुढाकार घेतला.