औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन
आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आपले विभागीय दौरे सुरु केले आहेत. दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचा मराठवाडा विभागीय मेळावा १० फेब्रुवारी आयोजित केला आहे. विशेष म्हणजे रिपाइं चे अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाच्या वतीने १० फेब्रुवारीला औरंगाबाद येथील बीड बायपास परिसरातील जबिंदा लॉनवर दुपारी तीन वाजता मराठवाडा विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यात दलित, आदिवासी, भटके यांना न्याय हक्क मिळावे, प्रत्येक भूमीहीनाला पाच एकर गायरान जमीन, बेरोजगाराला पाच हजार रुपये बेकारी भत्ता, बेघरांना घर द्यावे अश्या प्रमुख समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर महात्मा फुले आणि अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ सक्षम करण्याची प्रमुख मागणीही यावेळी करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्ध व पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार चंद्रकांत खैरे यांना निमंत्रित करण्यात येणार आहेत. असे रिपाइंचे कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हंटले. यावेळी मिलिंद शेळके, दौलत खरात, किशोर थोरात, संजय ठोकळ, अरविंद अवसरमल आदी उपस्थित होते.