भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जयंती आज मोठ्या उत्साहात आहे. जयंती सोहळा म्हटलं की भीमसैनिकांच्या उत्साहाला पारावर राहात नाही. भव्य मंडप, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, छातीत धडकी भरविणारा डॉल्बी, जंगी ढोल ताशांची मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी आदी करणं म्हणजे जयंती असा एक पायंडा पडला आहे, त्याला फाटा देत पंढरपूरच्या जयभीम तरुण मंडळा ने एक आदर्श समाजासमोर आखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
जयभीम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी जयंतीच्या निमित्ताने जमा झालेली रक्कम दलित समाजातील होतकरू तसेच गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. जयभीम तरुण मंडळ आतापर्यंत धुमधडाक्यात जयंती करण्यातच पैसे खर्च करत होते. मात्र बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं सामाजिक काम करून जयंती साजरी केली तर ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन ठरेल. या मदतीमधून ,वडील रिक्षाचालक असलेल्या एका विद्यार्थिनीच्या वैद्यकीय शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेतली जाणार आहे. तर पाचवी ते दहावी या वर्गातील १४० मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी या मंडळाने घेतली आहे.