हिंगोली : बहुजननामा ऑनलाइन – भविष्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी जो पक्ष बहुजन समाजासाठी काम करेल, त्या पक्षाच्या पाठीमागे भीम आर्मी खंबीरपणे उभी राहील. मी स्थानिकची माहिती घेतल्याशिवाय कुणालाही सहकार्य करणार नाही. पण, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी इमानदारीने काम केले तर त्यांना सहकार्य करेल, असे स्पष्टीकरण भीमआर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी हिंगोलीत माध्यमांशी बोलताना केले.आझाद हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते अमरावती येथे सभेसाठी जात असताना हिंगोलीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दीपक भालेराव, अशोक कांबळे, सुनील थोरात, नेहा शिंदे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आझाद म्हणाले की, महाराष्ट्र सरकार माझ्या सभेला परवानगी देत नाही. स्वतंत्र भारतात हा अन्याय आहे. महाराष्ट्रात भाजपा सरकारचा पगडा आहे. मी सत्य समोर आणेल म्हणून सरकार माझ्या सभेला परवानगी नाकारत आहे, असा दावाही आझाद यांनी केला. हे सरकार खोटारडे असून, भारतीय संविधानानुसार देश चालने अपेक्षित आहे. पण, तसे होताना दिसत नाही. या विरोधात भीमआर्मी मोठा लढा उभा करणार असून, बहुजन समाजाच्या हितासाठी सातत्याने पुढाकार घेईल. महाराष्ट्र पोलीस हे सरकारच्या इशाऱ्यावर चालत आहेत. असे असलेतरी भीम आर्मीला कुणीही कमजोर समजू नये. दिवस बदलत असतात, उद्या भीमआर्मीचेही दिवस येतील, असा आशावाद व्यक्त करीत भविष्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीला आपला पाठिंबा कुणाला असेल? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्रात काम करतात. मी देशात काम करतो. त्यांनी इमानदारीने काम केले तर भीमआर्मी त्यांना सहकार्य करेल. तत्पूर्वी मी स्थानिक परिस्थितीची संपूर्ण माहिती घेत बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या पक्षाला पाठिंबा देईन, असे आझाद यांनी जाहीर केले.