पुणे : बहुजननामा ऑनलाइन – १ जानेवारी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला आभिवादन करण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून लाखो आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमा येथे दाखल झाले, दरम्यान चोख सुरक्षा व्यव्यस्था तसेच परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. मात्र गेल्या वर्षी झालेल्या दंगलीमुळे आम्ही जागे झालो, असे म्हणत पहिल्यांदाच हजारो आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमा येथे दाखल झाले आहेत.
ऐतिहासिक विजयदिन
पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावून पेशव्यांच्या सैन्याचा १ जानेवारी १८१८ रोजी पराभव केला होता. या लढाईला यंदा २०१ वर्षे पूर्ण झाली. या विजयाचे प्रतीक म्हणून कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. विशेष म्हणजे दरवर्षी १ जानेवारी रोजी देशभरातील विविध संस्था, संघटना आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात.
१ जानेवारी २०१८ ला झालेला हिंसाचार
दरम्यान १ जानेवारी २०१८ ला अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांवर समाजकंटकांनी दगडफेक केल्याने हिंसाचार झाला होता. इतकेच नव्हे तर त्या दंगलीचे पडसाद देशभरात उमटले होते. त्यामुळे गेल्या वर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर परिसरातील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आले आहे.
यावर्षी पोलिसांनी केलेला चोख बंदोबस्त
विशेष म्हणजे जवळपास साडे सात हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याचबरोबर छुपे कॅमेरे, सीसीटीव्ही, ड्रोन यांच्या साहाय्याने परिसरावर नजर ठेवली जात आहे. इतकेच नव्हे तर कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासाठी वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे.
आता मरणही आले तरी चालेल
विशेष म्हणजे आजपर्यंत कोरेगाव – भीमा येथे ऐतिहासिक विजयस्तंभाला आभिवादन करण्यासाठी एकदाही न आलेले अनुयायी देखील यावर्षी आभिवादन करण्यासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान पहिल्यांदाच येणाऱ्या अनुयायांशी संवाद साधला असता, गेल्यावर्षी जी दंगल झाली त्यावेळी आम्ही झोपलो होतोत. आता आम्ही जागे झालो आहोत. इतकेच नव्हे तर आता मरणही आले तरी चालेल. त्यामुळे आम्ही यावर्षी ऐतिहासिक विजयस्तंभाला आभिवादन करण्यासाठी आलो आहोत. असे पहिल्यांदाच आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी म्हंटले आहे.