मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – इंदू मिलमधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने कमी करून शिवाजी पार्कमध्ये फिरायला येणाऱ्यांसाठी जॉगिंग पार्क उभारत आहात ? असा सवाल रिपब्लिकन सेनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. याचबरोबर सरकारने आंबेडकरी जनतेची घोर फसवणुक केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इंदू मिलच्या सुमारे साडेबारा एकर जमिनीवर भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.इतकेच नव्हे तर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्याचे काम प्रख्यात मूर्तीकार राम सुतार यांना देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर पुतळ्यासोबतच प्रदर्शन हॉल, चैत्यभूमीपर्यंत परिक्रमा मार्ग, बौद्ध स्थापत्य शैलीनुसार घुमट, संशोधन केंद्र, व्याख्यान सभागृह, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ, त्यांच्यावरील, तसेच बौद्ध धर्माशी संबंधित जगभरातील ग्रंथ आदींचा समावेश असणार आहे.
मात्र पुतळ्याची उंची १०० फुटांनी कमी करण्यात आल्याने वाद निर्माण झाला होता. विशेष म्हणजे इंदू मिलची जमीन राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची म्हणजेच केंद्र सरकारची होती. ती गेल्या वर्षी राज्य सरकारच्या ताब्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या स्मारकासाठी डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांनी अनेक आंदोलने केली आहेत.
दरम्यान आनंदराज आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने कमी करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. चौकशी न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशाराही त्यांनी दिला यावेळी दिला. आंबेडकरी समाजाची फसवणूक करण्याचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत. या पुतळ्यासंबंधी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, फडणवीस यांनी पुतळ्याची उंची चबुतऱ्यापासून मोजत असल्याचे मला सांगितले. ‘मी अनेक २ फुटाच्या अर्धपुतळ्यांना अभिवादन केले, त्याला १० फुटी चबुतरा असतो. मग काय पुतळा १२ फुटी झाला का?’, असे मला मुख्यमंत्र्यांना तोंडावर सांगायचे होते, असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.
इतकेच नव्हे तर स्मारक करायची प्रामाणिक इच्छा सरकारमधे दिसत नाही. मुळ स्मारकाच्या संकल्पनेत डॉ. आंबेडकरांचा पुतळा ३९५ फुटी असावा. घटनेच्या कलमांच्या संख्येइतकी पुतळ्याची उंची असावी. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी उभारावा, अशी मागणी होती. सरकारने स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीची संकल्पना चोरून ६०० फुटी स्टेच्यू ऑफ युनिटी उभारला, असा आरोपही आनंदराज आंबेडकर यांनी केला. सरकारचा पैसा न घेता आंबेडकरी जनता आपल्या पैशातून भव्य स्मारक उभारेल. आम्ही या सरकारचा जाहीर निषेध करतो, असेही त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे आंबेडकरी विचाराचे सरकार सत्तेत येईल, त्यावेळी आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना साजेशे स्मारक उभे करेल,असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर तुम्हाला जमत नसेल तर जनतेच्या पैशातून स्मारक करू नका. असा टोलाही आनंदराज आंबेडकर यांनी सरकारला लगावला.