हिंगोली : बहुजननामा ऑनलाइन – राजा हा पूर्वी राणीच्या पोटातून जन्म घेत असे पण आता राजा हा लोकशाहीत एव्हीएम मशीनमधून जन्माला येत आहे,असे सांगताना जातीच्या आधारावर लोकशाही पुढे जाऊ शकत नाही, असे विचार सुधीर मुनगंटीवार यांनी हिंगोली येथे झालेल्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन व पायाभरणी सोहळ्यासाठी आले असता त्यांनी जाहीर सभेत बोलतांना व्यक्त केले.हिंगोली येथे नगरपालिकेच्या वतीने विविध चार विकास कामाचे भूमिपूजन व पायाभरणी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते कामाची पायाभरणी झाली. त्यांनर गांधी चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला पालकमंत्री दिलीप कांबळे , आ.तान्हाजी मुटकुळे., नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी आ.गजानन घुगे, माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार, पी.आर.देशमुख, मुख्याधिकारी रामदास पाटील, उपनगराक्ष दिलीप चव्हाण आदींची उपस्थिती होती. ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आपण हिंगोली नगरपालिकेच्या मागील निवडणुकीच्या प्रचाराला आलो असता हिंगोलीकरांनी भाजपच्या उमेदवाराला नगराध्यक्ष दिला तर पन्नास कोटी रूपये देण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार मी हिंगोली शहराच्या विकासासाठी पाच वर्षात हा निधी आपण देणार होतो, पण आपण हिंगोली जिल्ह्याचा जावई असल्याने दोनच वर्षात हिंगोलीसाठी ४३ कोटी रूपये दिले आहेत.
उर्वरित ७ कोटी रूपये हे येणाऱ्या दोन महिन्यात देणार आहेत, असा शब्द देखील त्यांनी यावेळी दिला. विजय झाला तर माजायचे नाही तर पराभूत झाले तर लाजायचे नाही, असा सल्लाही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला. अन्न, वस्त्र व निवारा ह्या मूलभूत गरजा असल्याचे सांगत सर्वांनी घरे मिळाली पाहिजेत, तेंव्हा नगरपालिकेने अशा कामाला गती देण्याचे काम केले पाहिजे, अशा सूचनाही त्यांनी आपल्या भाषणातुन केल्या. प्रास्ताविक मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी केले. मस्के यांनी सूत्रसंचालन केले. अभिंयता रत्नाकर अडसिरे यांनी आभार मानले.