पुणतांबा : बहुजननामा ऑनलाइन – संपूर्ण कर्जमुक्तीसाठी किसान क्रांतीच्या वतीने राज्यात २६ जानेवारीपासून शिवजयंतीपर्यंत सरकारच्या विरोधात आक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे.’देता की जाता’ या आंदोलनाची मशाल पुणतांब्यात पेटवून सरकारच्या विरोधात आक्रोश यात्रा काढण्याचा निर्धार झालेल्या किसान क्रांतीच्या बैठकीत करण्यात आला.
मकरसंक्रांतीच्या दिवशीच सरकारवर संक्रात आली आहे. मागील वर्षी झालेल्या शेतकरी संपाच्यावेळी किसान क्रांतीला सरकारने दिलेली आश्वासने गेल्या दीड वर्षात पूर्ण केली नाही. म्हणून सरकारच्या विरोधात शेतकरी वर्गात संतप्त भावना असून संपूर्ण कर्जमुक्ती व इतर मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात यासाठी पुणतांब्यात मकर संक्रांतीचा मुहूर्त साधून सरकारच्या विरोधात आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.