सोलापूर : बहुजननामा ऑनलाइन – आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूर दौऱ्यावर येत असून, यावेळी लिंगायत समाजाच्या मागण्या समजून घेण्यासंदर्भात त्यांनी लिंगायत समाजास वेळ द्यावा; अन्यथा हा समाज रस्त्यावर उतरून सनदशीर मार्गाने आंदोलन करेल, असा इशारा अखिल भारतीय लिंगायत समितीचे प्रदेश महासचिव विजयकुमार हत्तुरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
भारतात ८ कोटी लिंगायत समाज बांधव असून, त्यातील १ कोटी महाराष्ट्रात आहेत. कर्नाटक सरकारने दास कमिटी नेमून लिंगायत स्वतंत्र धर्म आहे असा अहवाल कर्नाटक सरकारकडे सादर केला. कर्नाटक सरकारने त्यांच्या विधिमंडळात एकमताने ठराव करून तो केंद्र सरकारकडे पाठवला आहे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा विधिमंडळात एकमताने ठराव करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा, अशी मागणी आम्ही वारंवार निवेदनाद्वारे, तसेच आंदोलने, निदर्शनाद्वारे करूनही मुख्यमंत्री त्याकडे लक्ष देत नसल्याचे हत्तुरे यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता द्यावी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळावा, ही आमची प्रमुख मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले. याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून आमची पंतप्रधानांसमवेत भेट घडवावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेस सकलेश बाभूळगावकर, सिद्धाराम कटारे, धोंडप्पा तोरणगी, धर्मराज हिरापुरे, सिद्धाराम बोळीगार, प्रा. शिवलिंग अचलेरे, मयूर स्वामी आदी उपस्थित होते.कोणतीही सत्ता नसताना कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी केंद्र सरकारकडून कोटींचा निधी आणून हजारो घरे बांधण्याचा संकल्प पूर्ण केला आहे. परंतु, सत्तेवर असताना सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महात्मा बसवेश्वर स्मारक समितीचे अध्यक्ष विजयकुमार देशमुख यांना चार वर्षात या ठिकाणी एक वीट आणता आली नाही.
त्यामुळे त्यांनी स्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची मागणी हत्तुरे यांनी केली. मंगळवेढा येथील संतांच्या कर्मभूमीत महात्मा बसवेश्वर यांची कर्मभूमी असलेल्या या ठिकाणी शंभर एकर जागेमध्ये भव्य अशा स्मारकाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच करावे असा आग्रह त्यांनी धरला..