सातारा : बहुजननामा ऑनलाइन – सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांची जन्मभुमी सातारा जिल्हयात असल्याचा जिल्हावासियांना अभिमान आहे. सर्वसामान्याची शिक्षणाची गरज ओळखून समाज शिकायला तयार नसताना समाज्याची मानसिकता बदलुन महिला शिक्षणाची क्रांती फुले दाम्पत्यामुळेच देशात घडली आहे, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निबांळकर यांनी केले. अंदोरी ता. खंडाळा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांचा संयुक्त जयंती सोहळयानिमित्त देण्यात येणारा सन २०१९ चा महात्मा फुले समता समाज भूषण पुरस्कार कामधेनु सेवा परिवाराचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मणराव आसबे यांना सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निबांळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी लोणंदचे सपोनि गिरीश दिघावकर, जिल्हा परिषद सदस्या दीपालीताई साळुंखे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नेवसे, बाळासो साळुंखे, नितीन होवाळ, धनाजी अहिरेकर, जालिंदर रासकर, दशरथ क्षीरसागर, सागर शेळके, योगेश क्षीरसागर, रविंद्र क्षीरसागर, गजेंद्र मुसळे, देवीदास चव्हाण, बाळुभाऊ ननावरे, नानासो ननावरे, संजय जाधव, किसन ननावरे, दत्तात्रय धायगुडे आदींची उपस्थिती होती.संजीवराजे म्हणाले, या पुरस्काराच्या निमित्ताने अंदोरीत चांगला उपक्रम राबवला जात असुन छोट्या गावातला मोठा पुरस्कार इतराना प्रेरणादायी आहे.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले हे मोठे ऊर्जास्थान असुन त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार डॉ. लक्ष्मणराव आसबेसारख्या समाजसेवकाला देताना मला आनंद होत आहे. डॉ. लक्ष्मणराव आसबे म्हणाले, ज्योतीरावाच्या ज्योतीमध्ये ज्योर्तिमय झालेली सावित्रीबाई ही खरी विद्येची देवता असुन व्रत वैकल्ये करण्यापेक्षा सावित्रीबाई फुलेच्या चरित्राची पारायणे करा. सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन प्रत्येकाने जीवन जगणे गरजेचे असुन समाज्यापुढे असणारे आदर्श बदलले तरच समाज बदलेल. मी विधवा महिला व त्यांच्या मुलासाठी काम करत असताना मला मिळालेला महात्मा फुलेच्या नावाचा हा सन्मान माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान आहे.