यवतमाळ : बहुजननामा ऑनलाइन – आज एकविसावे शतक स्त्री-पुुरुष समानतेचे शतक म्हणून ओळखले जाते. पण यापूर्वी अनेक शतके महिलांची गळचेपी होत होती. त्यांना बालविवाहापासून केशवनापर्यंत अनिष्ठ रूढी, प्रथा, परंपरांना बळी पडावे लागत होते. स्त्री सक्षमीकरणात तथागत बुद्ध, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकरांनी प्रभावीपणे समाज प्रबोधन आणि समाज जागृती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना माणूस म्हणून जगण्याचा घटनात्मक अधिकार दिला, असे प्रतिपादन प्रा. डॉ. बाळकृष्ण सरकटे यांनी केले.
सावित्री जोतिराव समाजकार्य महाविद्यालातील राष्ट्रीय सेवा योजनेद्वारा आयोजित दत्तकग्राम बरबडा येथील निवासी शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. त्यानंतर पुढे बोलताना डॉ. सरकटे म्हणाले, रशियामध्ये महिलांना समान वेतन मिळावे, यासाठी स्त्रीयांना आंदोलन करावे लागले. भारत मात्र डॉ. आंबेडकरांनी समान वेतन, प्रसूती रजा, वारसा हक्क, गर्भपाताचा कायदा, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत, देशातील सन्मानाची पदे तसेच अनेक कायद्यांतर्गत सक्षम बनविले.
महिलांच्या हिताचे हिंदू कोड बिल संसदेत पारित होत नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आज महिला विविध क्षेत्रात प्रगती करताना दिसत असल्या तरी आदिवासी भटक्या-विमुक्त, मसन जोगी, नाथजोगी आणि पारधी समाजातील महिलांची फारशी प्रगती झाल्याचे दिसून येत नाही. या महिलांचे प्रबोधन करून त्यांना जागरुक करणे गरजेचे आहे, असे सांगितले. प्रास्ताविक प्रा. डॉ. अरुण शेंडे यांनी तर संचालन महेश चव्हाण यांनी, अश्विनी मडावी या विद्यार्थिनीने आभार मानले. यशस्वीतेसाठी रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.