औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन
विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने मागील साडेतीन वर्षांपासून बंद असलेली स्व.बाळासाहेब ठाकरे मोफत अंत्यविधी योजना पुन्हा सुरु होणार आहे. वसुधा वुडलेस क्रिमेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून शहरातील सहा स्मशानभूमीमध्ये ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाणार आहे.
२०१४ मध्ये तत्कालीन महापौर कला ओझा व उपमहापौर संजय जोशी यांनी पुढाकार घेऊन स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मोफत अंत्यविधी योजना सुरू केली होती. मात्र वर्षभरानंतरच ही योजना बंद पडली. दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे राजेश जैन व वसुधा वुडलेस क्रिमेशन फाऊंडेशनचे व्यवस्थापक अभिषेक उटांगडे यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांच्याशी चर्चा केली. दरम्यान या योजनेसाठी आर्थिक मदत करण्याचा प्रस्ताव विश्व हिंदू परिषदेने पालिकेसमोर ठेवला. इतकेच नव्हे तर प्रायोगिक तत्त्वावर शहरात सहा ठिकाणी मोफत अंत्यविधी योजना राबविण्याची तयारीही त्यांनी दर्शवली.
विशेष म्हणजे शहरातील सहा स्मशानभूमीमध्ये ही योजना वसुधा वुडलेस क्रिमेशन फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर राबविली जाणार आहे. ही संस्था विजेवर चालणारे यंत्र व गौऱ्यांद्वारे मृतांवर अंत्यविधी करणार आहे. त्यासंबंधीचा धोरणात्मक प्रस्ताव १८ जानेवारीच्या सभेत मंजुरीसाठी येणार आहे.
दरम्यान एका पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास साडेचार हजार रुपयांचा खर्च येतो. निम्मा खर्च संबंधित संस्था उचलणार असून, उर्वरित खर्च पालिकेकडून दिला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. प्रतापनगर, कैलासनगर, एन-६, बनेवाडी, मुकुंदवाडी, पुष्पनगरी या सहा ठिकाणी मशीन सीएसआर फंडातून बसविण्यात येणार आहेत.