मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून अर्थात वर्क फ्रॉम होमची सुविधा दिली आहे. विशेष करून आयटी सेक्टर आणि अन्य काही कर्मचारी ज्यांचे काम घरातून होऊ शकते ते कर्मचारी मागील सहा महिन्यांपासून घरातून काम करत आहेत. परंतु आता याचा कंटाळा कर्माचाऱ्यांना आला आहे. घरातून काम करणारे कर्मचारी खपूच कंटाळले आहेत आणि ऑफिसच्या वातावरणाला मिस करत आहेत. आंतरराष्ट्रीय संपत्ती सल्लागार नाइट फ्रँक इंडियाच्या एका सर्व्हेमधून ही बाब स्पष्ट झाली.
या सर्व्हेमध्ये ९० टक्के कर्मचाऱ्यांनी घरातून काम करताना ऑफिसची आठवण येते, असे मत मांडले आहे. दिल्ली आणि परिसरातील ९८ टक्के, मुंबईतील ९४ टक्के, बंगळुरू ९१ टक्के, चेन्नई ९० टक्के, पुणे ८८ टक्के आणि हैदराबाद ८१ टक्के कर्मचाऱ्यांना आपल्या ऑफिसची आठवण येत आहे. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या वर्क फ्रॉम होममुळे कामाची क्षमता आणि कामगिरीवर परिणाम झाल्याचेही समोर आले आहे. ३० टक्के कर्मचाऱ्यांनी घरातून काम केल्यामुळे क्षमता आणि कामगिरी यावर परिणाम झाल्याचे म्हटले आहे.
घरातून काम केल्यामुळे ६० टक्के लोकांचा प्रवासाचा वेळ वाचतो, ५८ टक्के लोकांनी बचत होते असे सांगितले आहे. परंतु, त्यावेळी सामाजिक आयुष्य नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे. भारतातील आयटी कंपन्या दर वर्षी त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या ४.३ टक्के खर्च ऑफिसच्या भाड्यासाठी खर्च करतात. छोट्या आयटी कंपन्या ४.७ टक्के तर मोठ्या आयटी कंपन्या ४.४ टक्के आणि मध्यम ३.६ टक्के इतका खर्च करतात.
वर्क फ्रॉम होमचा उद्देश कोरोनाचे संक्रमण रोखण्याचा होता. पण भारतात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मात्र, लॉकडाऊन उघडला आणि सगळे काही पूर्ववत झाले तर किती कर्मचारी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.