सोलापूर : महिलांनी केवळ चूल आणि मूल या संकल्पनेत न राहता, स्वत:च्या कक्षा व्यापक करण्याची गरज आहे. वंचित बहुजन आघाडीमध्ये महिला सुरक्षित असून त्यांनी राजकारणात यावे, असे आवाहन वंचित बहुजन महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या प्रा. अंजली आंबेडकर एका वर्तमानपत्राशी बोलतान केले.
डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघ व भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यानिमित्त अंजली आंबेजकर सोलापूरमध्ये आल्या होत्या. कार्यक्रमानंतर त्यांनी आपले मत व्यक्त केले. अंजली आंबेडकर म्हणाल्या की, महिलांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.
त्यामुळे त्या राजकारणात आल्या तर उत्कृष्ट काम करु शकतील.वैचारिक, सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक चळवळ महिलांनी उभी करावी. प्रत्येक महिलेने आपल्या सुना-बाळा,मुलींच्या मागे जिजाऊंप्रमाणे उभे राहवे. वंचित शब्दावरुन सुरु असलेल्या राजकारणावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, वंचित बहुजन आघाडीमधील वंचित या शब्दाचा अर्थ उलगडेल तेव्हा समाजातील सर्व जातीधर्मातील लोक जोडले जातील. तसेच कार्यकर्त्यांना आवाहन करताना त्या म्हणाल्या वंचित शब्दाचा अर्थ समजून घ्या, कोण कोण वंचित आहेत त्यांच्यापर्यंत पोहचा, आपापल्या परिसरातील मूलभूत प्रश्न उचलून धरा सोलापुरात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे तो उचलून धरा, सच्चा कार्यकर्ता म्हणून स्वत:ला घडवा.