बहुजननामा ऑनलाइन – युपी सरकारवर टीका करण्याचे अधिकार जरूर आहेत पण महाराष्ट्रातील लेकी-सुनांच्या सुरक्षिततेसाठी मुख्यमंत्र्यांच्या (cm uddhav thackeray )समोर कधी प्रश्न उपस्थित करणार ? गेल्या 6 महिन्यात महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचे काय ? असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे. हाथरस प्रकरणावरून राज्यात सत्ताधारी काँग्रेस आणि शिवसेना(cm uddhav thackeray )आंदोलन करत आहे. यावरून आता भाजपनं महाराष्ट्राबद्दल सवाल केला आहे. हाथरसच्या घटनेवरून आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही चांगलंच तापल्याचं दिसत आहे.
केशव उपाध्ये म्हणाले, “हाथरस प्रकरण दुर्दैवीच आहे आणि त्याची दखल घेत तेथील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करत हे प्रकरण सीबीआयकडे दिले आहे. परंतु इथं गेल्या 6 महिन्यात ज्या घटना घडल्या त्यावर किती कारवाई झाली ? इतर ठिकाणची उठाठेव जरूर करा परंतु आपल्या अंगणात काय सुरू आहे हे कधी पाहणार ?” असा टोलाही त्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.
पुढं बोलताना उपाध्ये म्हणाले, “हाथरस येथील घटनेविरोधात आंदोलन करण्याचा काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेला अधिकार आहे. मात्र त्याचसोबत हे तिन्ही पक्ष महाराष्ट्रातील सरकारमध्ये सहभागी आहेत. त्या सरकारनं गेल्या 6 महिन्यात महाराष्ट्रात महिला, तरुणी, अल्पवयीन मुली, बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात काय केलं आहे हेही मुख्यमंत्र्यांना विचारण्याचं धाडस दाखवावं. महाराष्ट्रात कोरोना उपचारासाठी दाखल झालेल्या महिला रुग्णांवर बलात्कार विनयभंगासारख्या संतापजनक घटना घडलेल्या आहेत. पनवेल, पुणे, इचलकरंजी, नंदुरबार, चंद्रपूर येथे विलगीकरण केंद्रात महिला, तरुणींवर अत्याचार, विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत” याकडं भाजपनं लक्ष वेधलं आहे.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे शासकीय लॅबमधील टेक्निशियननं कोरोना चाचणीच्या नावाखाली युवतीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याची घटना घडली आहे. फेब्रुवारीत 7 वेगवेगळ्या घटनांमध्ये युवती/महिलांना जिवंत जाळलं गेलं. हिंगणघाट, सिल्लोड, पनवेल, मीरारोड, लातूर, नागपूर, लासलगाव या ठिकाणी या घटना घडल्या. यातील चौघींना जीवाला मुकावं लागलं. या घटनांचे गांभीर्य बाळासाहेब थोरात किंवा काँग्रेस तसेच राष्ट्रवादी व शिवसेनेला समजलेलं नाही असं म्हणायचं का ? असा सवालही भाजपनं उपस्थित केला आहे.