मुंबई बहुजननामा : भाजी चिरण्याचा चाकूने पतीच्या पोटावर ११ वार करून , नंतर गळा कापून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नालासोपारा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने पोलिसांना फोन करून पतीने आत्महत्या केल्याचे सांगितले. परंतु तिचा हा बनाव अयशस्वी झाला , काही वेळातच सगळा प्रकार पोलिसांच्या समोर आला. आरोपीने गुन्हे काबुल केले . प्रणाली कदम (वय-३३) असे या आरोपी महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. सुनील कदम (वय-३६) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , नालासोपारा येथील गालानगर परिसरातील ओम तुलसी अपार्टमेंटमध्ये सुनील कदम, पत्नी प्रणाली, आई-वडील आणि दोन मुलींसोबत राहत होता. बुधवारी पहाटे पाच वाजता सुनील आणि प्रणालीमध्ये कडाक्याचे भांडण झाले. वादाला कंटाळून सुनील बेडरूममध्ये पुन्हा झोपायला गेला असता प्रणाली पाणी पिण्याच्या बहाण्याने किचनमध्ये गेली. प्रणाली हातात चाकू घेऊन परतली. सुनील झोपला असताना तिने त्याच्या पोटावर चाकूने ११ वार केले. नंतर त्याचा गळा कापून निर्घृण हत्या केली. पतीची हत्या केल्यानंतर प्रणाली दुसऱ्या खोलीत गेली. तिथे सासू-सासरे आणि दोन मुली झोपल्या होत्या. तिने खोलीत जाताच बेशुद्ध झाल्याचे नाटक केले. सासू-सासरे झोपेतून जागे झाले. सुनीलने आत्महत्या केल्याचे त्यांना सांगितले. नंतर प्रणालीने पोलिसांना फोन करून पतीने आत्महत्या केलाचा बनाव केला. पोलिस तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
कोणतीही व्यक्ती स्वत:च्या पोटावर ११ वार करू शकत नाही. तसेच स्वत: चा गळाही चिरून आत्महत्या करू शकत नाही, हे पोलिसांच्या तपासात समोर येताच पोलसांनी प्रणालीला यासंदर्भात विचारणा केली. पतीची हत्या केल्याचे तिने पोलिसांसमोर कबूल केले. आपल्या पतीचे बाहेर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हत्या केल्याचे तिने पोलिसांना सांगितले.