सांगली : बहुजननामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत राहीलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीसोबत पुन्हा पंगा घेतला आहे. यावेळी त्यांनी मंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांना लोकांनी निवडून दिले. माला थेट आमदारांनी निवडून दिले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या महत्त्वाच्या बैठकीला मला का बोलवले नाही ? विधान परिषदेच्या आमदारांना बैठकीला बोलवण्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यात धारिष्ट्य नाही का ? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.
दूध दर आंदोलनाचे निवेदन देण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या आढावा बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने विधान परिषदेचे आमदार नाराज झाले आहेत. आमदार सदाभाऊ खोत यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता नूतन आमदार गोपीचंद पडळकर यांनीही पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना आमदार पडळकर म्हणाले, जयंत पाटील यांना एक लाख लोकांनी निवडून दिले. जनतेने निवडून दिलेल्या आमदारांनी मला निवडून दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आल्यावरच मला आढावा बैठक असल्याचे समजले. मला बैठकीला का बोलवले नाही हे माहीत नाही. पण महत्त्वाच्या बैठकीसाठी विधानसभा आणि विधान परिषद आमदार असा भेदभाव करणे योग्य नाही. पालकमंत्री पाटील यांच्यात विरोधी पक्षांच्या आमदारांना बैठकीला बोलवण्याचे धारिष्ट्य नाही का ? त्यांनी कोरोना संकटावरून राजकारण करू नये, असे पडळकर यांनी म्हटले आहे. आमदार सदाभाऊ खोत यांनीही बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तर आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त करत निशाणा साधला आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये येत्या काळात जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यात राजकीय सामना रंगणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.