बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : संसदेच्या अधिवेशनास सुरुवात झाली असून शेतकरी आंदोलनावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. लॉकडाऊनचा निर्णय केंद्र सरकारने चार तासात घेतला. एका दिवसात नोटबंदी जाहीर केली. असे असताना २६ जानेवारी रोजी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत हिंसाचार होऊ शकतो, यासंदर्भातील सूचना गुप्तचर विभागाला मिळाली नाही का, आपला गुप्तचर विभाग कुठे होता, काय करत होता असा सवाल अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी केंद्र सरकारला केला आहे.
संसदेत बोलताना हरसिमरत कौर बादल म्हणाल्या, शीख समुदायाचे भारताच्या स्वातंत्र्यामध्ये मोठे योगदान होते. देशाच्या कामी ७० टक्के शीखांचे हौतात्म्य आले, असा दावा करत निशान साहिब ध्वजाला आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले. आपण सर्वांनाच खलिस्तानी ठरवून मोकळे होत आहात. लोकांच्या रक्षणासाठी आमचे ९ वे गुरु स्वतः कामी आले, असेही त्या म्हणाल्या.
त्यासाठी जबाबदार कोण?
प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या रॅलीत हिंसाचार होणे हे दुर्दैवी आहे. यात गुप्तचर विभाग फेल गेला, त्याचे उत्तर कोण देणार, त्यासाठी जबाबदार कोणाला धरायचे, असे प्रश्न उपस्थित करत दीडशेहून अधिक आंदोलनकांनी आपला जीव गमावला. ते आमचे अन्नदाते आहेत. मात्र, त्यांच्याबाबत संवेदना दाखवत एकही शब्द बोलला गेला नसल्याची
खंतही हरसिमरत कौर बादल यांनी बोलून दाखवली.
नव्या कृषी कायद्यांतर्गत केलेल्या तरतुदीनुसार भारतीय खाद्य निगमला खरेदी आणि विक्री प्रक्रियेपासून दूर ठेवले जात आहे. म्हणूनच शेतकरी चिंतेत आहेत. कायद्याचा अध्यादेश आणल्यापासून शेतकरी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सरकार मूग गिळून गप्प बसलेय. शेतकऱ्यांना कायदा नको असेल, तर हा काळा कायदा मागे घ्यावा, अशी मागणीही कौर यांनी यावेळी केली.