मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा सुड घेण्यासाठी पाकिस्तानशी आरपारची लढाई लढली पाहिजे. आपल्या भारतीय सैन्यामध्ये एवढी ताकद आहे, पाकिस्तानशी युद्ध झाले तर काश्मीर तर आपल्या ताब्यातच राहील. तसेच पाकिस्तान ताब्यात घेण्याची ताकद भारतीय सैन्यात आहे. असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.
सुमन नगर, प्रियदर्शिनी सर्कल, चेंबूर येथे पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना भावपुर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी जाहीर सभेचे आयोजन रिपाइं तर्फे करण्यात आले होते. त्यावेळी रामदास आठवले बोलत होते. यावेळी विचारमंचावर आयोजक अशोक जाधव, वनिता वाघमारे, रिपाइंचे प्रवक्ते अविनाश महातेकर, गौतम सोनवणे, सिद्धार्थ कासारे, विवेक पवार, कांतिकुमार जैन, किसन रोकडे, अमर कसबे, ऍड. अभयाताई सोनवणे, बाळ गरुड, तेजस्विनी रोकडे, शकुंतला सरोदे, रावसाहेब सातपुते, हेमंत रणपिसे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
सीमेपलिकडे असलेले अतिरेक्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी तरुणांनी सैन्यात भरती व्हावे असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले. शहिद जवानांच्या कुटुंबाच्या दु:खामध्ये संपूर्ण देश सहभागी आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी सर्व पक्षांनी मतभेद विसरुन भारतीय सैन्य आणि भारत सरकारच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी यावेळी केले.