बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे जगभरात अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे जागतिक बाजारातील पुरवठा साखळीचे महत्त्व नव्याने अधोरेखित केले आहे. कोरोनानंतर जागतिक व्यवहारांमधील गुंतागुंत अधिक वाढून अधिक आत्मकेंद्री बनून राष्ट्रवादीही बनेल, असे मत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले आहे.
एस. जयशंकर यांनी भारताचे आर्थिक स्वावलंबन आणि तिचे परराष्ट्र धोरणातील महत्त्वही विशद केले. 20-30 वर्षांत जागतिकीकरणाने समस्या निर्माण केल्या आहेत. स्वस्त माल देशात आयात झाला. त्याचा भारताच्या उत्पादन क्षेत्रावर विपरित परिणाम झाला. अनेक देशांशी व्यापारी तूट वाढत गेली. समान स्तरावर स्पर्धा झाली नाही. खुल्या आर्थिक धोरणाचा फायदा मिळालाच असे नाही. भारताला जागतिक अर्थव्यवस्थेशी स्पर्धा करायची तर देशांतर्गत क्षमता वाढवल्या पाहिजेत.
भारताचे स्वावलंबन जागतिकीकरणाविरोधी नाही. भारत अधिक राष्ट्रवादी होताना अधिकाधिक जागतिक होत आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. कोरोनाच्या सुरुवातीला देशात कृत्रिम श्वसन यंत्रांची निर्मिती होत नव्हती. त्यातून देशातील आरोग्य सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला गेला, याची आठवण त्यांनी करून दिली. चीनसह अन्य शेजारी राष्ट्रांशी शांतता आणि स्थर्य या मुद्द्यांच्या आधारे सौहार्दाचे संबंध ठेवण्याचा भारत प्रयत्न करत आहे, असे जयशंकर यांनी भाष्य केले.