नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्र आर्थिक व सामाजिक परिषदेच्या (ECOSOC) सत्राला संबोधित करताना भारताची धोरणे जगासमोर ठेवली. पीएम मोदींनी आपल्या सरकारच्या विकासकामांचा तसेच जगातील भारताच्या योगदानाचा उल्लेखही केला. इतकेच नव्हे तर बहुराष्ट्रीय एजन्सींच्या सध्याच्या स्वरूपात होणाऱ्या बदलास यापुढे उशीर होऊ नये, असे आवाहन त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व जागतिक मंचाला केले. तर जाणून घेऊया पंतप्रधान मोदींच्या भाषणातील मोठ्या गोष्टी …
सुधारण्याची संधी गमावू नका
मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या सद्यस्थितीत झालेल्या बदलाचे जोरदार समर्थन केले आणि म्हणाले की भारत या संदर्भात संपूर्ण जबाबदारीसह आपली भूमिका निभावण्यास तयार आहे. ते म्हणाले, ‘दुसर्या महायुद्धाच्या भीषण वातावरणामध्ये संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली होती. आता महामारीने तसेच वातावरण तयार केले आहे, तेव्हा आपल्याकडे ही संस्था सुधारण्याची आणि ती नवीन स्थापित करण्याची संधी आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या स्थापनेचे हे ७५ वे वर्ष आहे आणि आपण त्यात सुधारणा करण्याची संधी गमावू नये.’
Watch PM Shri @narendramodi's keynote address at United Nations Economic and Social Council session. https://t.co/rZgvAZTFAC
— BJP (@BJP4India) July 17, 2020
भारत आपली भूमिका निभावण्यास तयार
पीएम मोदी म्हणाले की, कोरोना आपल्या संयमाची चाचणी घेत आहे. कोरोना रोखण्याच्या लढाईत भारताने सर्वसामान्यांची मोहीम राबवली आहे. सरकार आणि नागरी संस्था एकत्र काम करत आहेत. जागतिक समरसता टिकवून ठेवण्याची आपली तीव्र उत्कटता, सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये सुसंवाद राखण्यासाठी भारत आपली महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्यास तयार आहे. पूर्वेत भूकंप असो वा चक्रीवादळ किंवा इबोला संकट असो, भारताने नेहमी वेळेवर आणि आघाडीवर राहून सेवा भावना दाखवली आहे.
प्रत्येकजण विकासाचा मंत्र घेऊन पुढे जात आहे
पुढे ते म्हणाले की, आम्ही सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या मंत्रासह पुढे जात आहोत. कोरोना महामारी दरम्यानही भारताने १५० देशांना मदत केली आहे. पंतप्रधानांनी गेल्या काही वर्षात भारत सरकारने राबवलेल्या सामाजिक व आर्थिक मोहिमेबद्दलही सांगितले की कसे सन २०२२ पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करुन देण्याचे काम चालू आहे. सन २०२५ पर्यंत टीबीपासून मुक्त होण्याच्या मोहीमेवर काम चालू आहे किंवा कोविड-१९ मुळे प्रभावित लोक आणि अर्थव्यवस्थेसाठी २० लाख कोटींचे पॅकेज कसे देण्यात आले आहे.
सिंगल युज प्लास्टिकविरुद्ध मोहीम
पीएम मोदी म्हणाले की, भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. आम्ही आत्मनिर्भर भारत अभियान सुरू केले आहे. संयुक्त राष्ट्रांनी ठरवलेल्या सामाजिक विकासाची उद्दीष्टे साध्य करण्याच्या संदर्भात पीएम मोदींनी सांगितले की या संदर्भात भारत सतत कसे प्रयत्न करत आहे. ते विकासाच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी वातावरणाविषयीही विचार करत आहेत. आम्ही स्वच्छतेसारखा महत्त्वाचा मुद्दा गांभीर्याने घेतला आणि आम्ही गतवर्षी देशातील सहा लाख गावांत स्वच्छता पूर्ण करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी केली. आम्ही सिंगल युज प्लास्टिकवर बंदी आणण्यासाठी मोहीमही राबवली आहे.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात जनआंदोलन केले
कोरोनाविरूद्धच्या लढ्यात जनआंदोलन करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, भारताच्या आरोग्य व्यवस्थेमुळे देशाला जगातील इतर देशांमध्ये समाविष्ट होण्यास मदत झाली आहे, जे संक्रमितांच्या बरे होण्याच्या दरानुसार सर्वात चांगले आहे. ते म्हणाले की, आम्ही महामारी विरुद्धच्या लढाईला सरकार आणि समाजाच्या प्रयत्नांची जनआंदोलन करण्याचा प्रयत्न केला. आमच्या सरकारने गरीब कुटुंबांना लाभ देण्यासाठी प्रथम प्राधान्य दिले आहे आणि ३०० अब्ज डॉलर्सहून अधिकचे पॅकेज जाहीर केले आहे.
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल
पीएम मोदी म्हणाले की, आम्ही आत्मनिर्भर भारताचा विचार ठेवला आहे, जो जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये समाकलित होईल. भारतात जगातील लोकसंख्येचा सहावा भाग राहतो. आम्हाला आमच्या जबाबदाऱ्यांचे पूर्ण भान आहे. आम्हाला माहित आहे की, जर भारत आपली विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यात यशस्वी झाला तर ते जागतिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक दूरगामी पाऊल असेल. भारत सरकारने सध्याच्या काळात राज्ये, स्थानिक सरकारे, नागरी समाज, समुदाय आणि लोकांचा समावेश करून संपूर्ण समाजाची विचारसरणी स्वीकारली आहे.
इकोसॉकशी भारताचा जुना संबंध
संयुक्त राष्ट्राच्या सहा प्रमुख अवयवांपैकी एक असलेल्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेशी (इकोसॉक) भारताचा खूप जुना संबंध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जानेवारी २०१६ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या ७० व्या जयंतीनिमित्त इकोसॉकला संबोधित केले होते. १९४६ मध्ये इकोसॉकच्या स्थापनेवर याची अध्यक्षता भारताचे सर रामास्वामी यांच्याकडे सोपवली होती.
दहशतवादावर एकत्र येण्याचे केले होते आवाहन
यापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये मोदींनी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणात महात्मा गांधी, स्वच्छता, दहशतवाद या मुद्द्यांवर भाष्य केले होते. महात्मा गांधींचा उल्लेख करताना ते म्हणाले होते की, महात्मा गांधींचे सत्य आणि अहिंसेचा संदेश आजही जगाशी संबंधित आहे. त्यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला दहशतवादाविरोधात एकत्र येण्याचे आवाहनही केले होते. दोन वर्षांसाठी भारत सुरक्षा मंडळाचा कायमस्वरुपी सदस्य म्हणून निवडला गेला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिका, युनायटेड किंगडम, फ्रान्स, रशिया आणि चीन या पाच कायमस्वरुपी सदस्यांचा समावेश आहे.
२२ रोजी इंडिया आयडियाज समिटला संबोधित करतील पीएम
पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जुलै रोजी कोविड-१९ नंतरच्या जगात अमेरिका आणि भारत भागीदारीच्या मुद्दयावर दोन दिवसीय ‘इंडिया आयडियाज समिट’ला संबोधित करतील. २१-२२ जुलै रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय व्हर्च्युअल समिटचे आयोजन यूएस-इंडिया बिझिनेस कौन्सिल (USIBC) करणार आहे. समिटला संबंधित करणाऱ्यांमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ, भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, अमेरिकेचे आरोग्य व मानवी सेवा विभागाचे उपसचिव एरिक हॅगन यांच्यासह इतर सहभागी आहेत.