बारामती : बहुजननामा ऑनलाइन – बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे गावचे सुपुत्र बिंटु राजाराम सूळ याना काश्मीरमध्ये वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अन् साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. यावेळी गावकऱ्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जवान बिंटु सूळ अमर रहे अशा घोषणा दिल्या. बिंटू सूळ यांना विरमरण आल्याचे वृत्त समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथील जवान बिंटू राजाराम सूळ यांना मंगळवारी (दि.29 डिसेंबर) जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. शनिवारी (दि.2 जानेवारी) बिंटू सूळ यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी कोऱ्हाळे येथे आणण्यात आले. यावेळी गावकऱ्यांसह तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते. अत्यंत शोकाकूल वातावरणात सूळ यांची अंत्ययात्रा निघाली. गावकऱ्यांनी बिंटू सूळ यांना साश्रू नयनांनी निरोप दिला.
जवान बिंटू सूळ यांच्यामागे त्यांचे आई-वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. बिंटू सूळ यांनी सैन्य दलामध्ये 14 वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा सेवा वाढवून घेतली होती.