नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात निर्वासितांना नागरिकत्व देण्यस्त काहीच चुकीचे नाही. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सीएए आणला गेला आहे. आतापर्यंत कोणत्याही सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात कोणतीही सुधारणा केली नव्हती. यात काय चुकले?’, असे विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय महासचिव राघुवुलु यांनी म्हटले आहे. तसेच विश्व हिंदू परिषदेचे तेलंगणाचे अध्यक्ष एम.रामराजा म्हणाले की, सीएए विरोधात फक्त अल्पसंख्याक समुदाय आंदोलन करत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा २०१४ पूर्वी भारतात आलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलांदेशातील हिंदू, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारशी नागरिकांना नागरिकत्व प्रदान करणार आहे. याअगोदर नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमधील तुमकूरमध्ये काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवर निशाणा साधत काँग्रेसवर आरोप केले की, ते पाकिस्तानमधून येणाऱ्या हिंदू निर्वासितांना विरोध करत आहेत. तसेच त्यांनी केंद्र सरकारच्या कामाचे मोजमापही केले.
काँग्रेस या कायद्याच्या विरोधात आंदोलन करत आहे. पण आम्ही धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याचे काम करत आहोत, असे मोदी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा उल्लेख करताना म्हणाले. २०१४ पासून सर्वसामान्यांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवण्यासाठी अभूतपूर्व प्रयत्न सुरु झाले आहेत, असे मोदी म्हणाले.
‘पाकिस्तान धर्माच्या जोरावर बांधला गेला. धार्मिक अल्पसंख्याकांवर तेथे छळ केला जातो. छळ झालेल्या लोकांना शरणार्थी म्हणून भारतात येण्यास भाग पाडले जाते. परंतु कॉंग्रेस आणि त्याचे सहयोगी पाकिस्तानविरूद्ध काही बोलत नाहीत, उलट ते या निर्वासितांविरूद्ध मोर्चे काढत आहेत. आता प्रत्येक भारतीयाचे मानस बनले आहे की आपल्याला वारशामध्ये आलेल्या समस्या सोडवाव्या लागतील, असेही मोदी यांनी म्हटले.