मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनामुळे जगातील विविध देशांमध्ये भारतीय अडकून पडले आहेत. त्यापार्श्वभूमीवर देशाच्या इतिहासात शांतता काळात होणार्या आजवरच्या सर्वात मोठ्या रेस्क्यू ऑपरेशनसाठी भारतीय विमाने आणि नौदलाची जहाजे सज्ज झाली आहेत. भारतीय विमाने परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या सर्वात मोठ्या अभियानाला आजपासून सुरुवात होणार आहे. ’वंदे भारत मिशन’ असे या अभियानाचे नाव आहे.
विमान आणि जहाजातून जवळपास 15 हजार भारतीयांना टप्प्याटप्प्याने मायदेशी आणले जाणार आहे. यासाठी विमानतळे आणि बंदरे पूर्णत: सज्ज करण्यात आली आहेत. एअर इंडियाचे विमान आज अबूधाबीवरुन 200 भारतीयांना घेऊन येणार आहे. परराष्ट्रातून उड्डाण होण्याआधी सर्व प्रवाशांची मेडिकल स्क्रीनिंग होणार आहे. मायदेशी परतीच्या प्रवासासाठी या नागरिकांना काही मोबदलाही द्यावा लागणार आहे. लंडन ते मुंबई या प्रवासासाठी 50 हजार रुपये, तर शिकागो ते दिल्ली या प्रवासासाठी साधारणपणे 1 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
एकूण 64 विमानांपैकी 10 विमाने यूएई, 2 कतारमध्ये, 5 सौदी अरेबिया, 7 ब्रिटनमध्ये, 5 सिंगापूरमध्ये, 7 अमेरिकेमध्ये, 5 फिलिपाईन्स, 7 बांग्लादेश, 2 बहारीनमध्ये, 7 मलेशियात, 5 कुवैतमध्ये, 4 ओमानमध्ये उड्डाण करणार आहेत. आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक बंद झाल्यानंतर जगाच्या वेगवेगळ्या कोपर्यात हे भारतीय अडकून पडले होते. हवाई आणि समुद्रमार्गे होणार्या या अभियानाची सुरुवात आजपासून (7 मे) होईल. टप्प्याटप्प्याने या भारतीयांना आणण्यासाठी केंद्र सरकारने एक तपशीलवार प्लॅन आखला आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमवर तिरुवनंतरपुरम, दिल्ली आणि मुंबईसह अनेक विमानतळावर आरोग्यासंबंधी सर्व व्यवस्था केली आहे.