बहुजननामा ऑनलाईन टीम – कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे इतर राज्यांमध्ये अनेक मजूर अडकून पडले आहेत. त्यामुळे आता देशातील विविध राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना उत्तर प्रदेश सरकार परत आणणार असल्याची माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. त्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशत्यांनी अधिकार्यांना दिले आहेत.
कोरोनामुळे इतर राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजूरांचे 14 दिवसांचे विलगीकरण पूर्ण केलेल्या लोकांची यादी तयार करावी, जेणेकरून त्यांना टप्प्या-टप्प्यात परत आणता येईल, असे वरिष्ठ अधिकार्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत आदित्यनाथ यांनी अधिकार्यांना सांगितले. संबंधित राज्यांनी या मजुरांची तपासणी करून त्यांना उत्तर प्रदेशच्या सीमेपर्यंत आणल्यानंतर त्यांना त्यांच्या खेडयांमध्ये पाठवण्यात येईल. मात्र आधी त्यांना त्यांच्या जिल्ह्यात 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात येईल. यासाठी व्यवस्था करावी आणि ती ठिकाणे र्निजतुक करावीत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. 14 दिवसांचे विलगीकरण पूर्ण केलेल्या लोकांना धान्य आणि 1 हजार रुपये देऊन घरी पाठवावे, असे निर्देश त्यांनी दिले.