पाटोदा : बहुजननामा ऑनलाईन – केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरीविरोधी असल्यामुळे जोपर्यंत पायउतार होत नाही तोपर्यंत अंगात शर्ट-बनियन न घालता अर्धनग्न आंदोलन करत सर्वांचे लक्ष वेधून घेणारे नगरसूल, ता. येवला येथील शेतकरी कृष्णा भगवान डोंगरे यांनी विधानसभेच्या मतदानापर्यंत आपले आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
शेतकरी कृष्णा भगवान डोंगरे यांनी गेल्या दोन वर्षापासून विविध अनोखे आंदोलने करत भाजपा सरकारची डोकेदुखी वाढविली आहे. तालुक्यातील पूर्वोत्तर दुष्काळी भाग असलेल्या नगरसूल गावात कृष्णा आपल्या कुटुंबासह शेती करतो. सन २०१७ मध्ये कांद्याला १०० ते १२५ रुपये भाव मिळाला म्हणून डोंगरे यांनी पाच एकर पिकाला पेटवून देत सरकारचा प्रतीकात्मक निषेध केला होता. त्यानंतर येवला तालुका दुष्काळी जाहीर करावा यासाठी २४ ऑक्टोबर २०१८ रोजी मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या रक्ताने पत्र लिहित मागणी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंगरे यांनी केंद्रातील मोदी सरकार जोपर्यंत पायउतार होत नाही तोवर अंगात शर्ट व बनियन न घालता अर्धनग्न आंदोलन पुकारले होते.
लोकसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकार प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तारुढ झाल्यानंतर डोंगरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र लोकसभा निकालाने अपेक्षाभंग झालेल्या डोंगरे यांनी आता सावध भूमिका घेत राज्यातील विधानसभा निवडणुकीतील मतदानापर्यंत आपले आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार केला आहे.
काय म्हणाले कृष्णा डोंगरे ?
मोदी सरकार हे शेतकरीविरोधी असून शेतकऱ्यांना फसविल्यामुळेच शासनाविरुद्ध मनात प्रचंड चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे मला हे आंदोलन करावे लागत आहे. लोकसभा निवडणूक झाली मात्र आता विधानसभेच्या मतदानापर्यंत माझे आंदोलन सुरुच राहील. आता तरी सरकारला जाग येईल का ? असा सवाल कृष्णा डोंगरे यांनी विचारला आहे.