पुणे बहुजननामा : गेल्या आठवडाभर सुरु असलेल्या अतिवृष्टीचा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला चांगलाच फटका बसला आहे. अनेक गावे उध्वस्त झाली असून सगळीकडे घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे या गावांच्या पुनर्वसनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. विद्यापीठाने पुराचा फटका बसलेली पाच गाव दत्तक घेतली आहे. या गावांना पुन्हा उभे करण्यासाठी आणि त्यांना मानसिक आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तसेच या शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांची समाविष्ठ करण्यात येणार आहे.
कोल्हापूर, सांगलीतील नद्या म्हणजेच पंचगंगा आणि कृष्णा नदीकाठच्या गावांनाच नाही , तर शहरातील अन्य गावांना देखील या महापुराला सामोरे जावे लागले. अनेक लोकांना आपले घरदार सोडून स्थलांतर करावे लागले आहे. ४० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे , तर अजूनही काही जण बेपत्ता आहेत. सध्या पावसाने जरा विश्रांती घेतल्याने , पूर ओसरला आहे . तरी काही ठिकाणी अजूनही पाणी साचलेले आहे. पूरग्रस्त नागरिकांसाठी राज्यभरातून मदतीचे हात पुढे येत आहे. खाण्याचे सामान , कपडे , पांघरून अश्या आवश्यक वस्तू पाठविण्यात येत आहे. आता खरी गरज आहे या उध्वस्त गावांना पुन्हा उभारण्यासाठी , गावांमध्ये पुराच्या पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य आहे. ते साफ करण्यासाठी मन्युष्यबळाची गरज आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाने हि गवे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
“पुरामुळे नुकसान झालेल्या गावांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. पुरामुळे पसरलेल्या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. सध्या पूरग्रस्त नागरिकांना राज्यभरातून अनेक आवश्यक वस्तूंची मदत पुरवली जात आहे. परंतु, पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सहाय्याने पुरग्रस्त गावांमध्ये स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे. शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या या पुनर्वसनासाठी विध्यार्थी सहभाग घेतील. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी देखील या ५ गावे दत्तक घेण्याच्या निर्णयास परवानगी दिली आहे. विद्यापीठाचे प्राध्यापक, प्राचार्य संघटना, संस्थाचालक, विद्यापीठाच्या अधिकार मंडळाचे सर्व सदस्य या सर्वानी चर्चा करून हा उपक्रम राबविणार असल्याची माहिती स्पष्ठ केली आहे. ” असे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी सांगितले.