नवी दिल्ली ( बहुजननामा ऑनलाइन) – भारतात घडत असलेल्या मॉब लिचिंग (जमावाकडून हल्ला) घटनांचा आंतराष्ट्रीय स्तरावर निषेध करण्यात येतो आहे. आता ब्रिटनचे खासदार जोनाथन एशवर्थ यांनी या प्रकरणी भारत सरकारचे कान टोचले आहेत. या घटना निषेधार्थ आहेत असे म्हणत या प्रकणांमध्ये ब्रिटन सरकारने लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसे पत्रदेखील त्यांनी ब्रिटन सरकार व देशाच्या परराष्ट्र सचिवांना लिहले आहे. टाइम्स नाऊने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
जोनाथन एशवर्थ हे ब्रिटनमधील लेबर पक्षाचे खासदार आहेत. आपल्या पत्रात भारत सरकारवर त्यांनी टिका केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की मुस्लिमांवर होणाऱ्या हल्लांबाबद भारत सरकार गंभीर नाही. प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार आहे त्यामुळे आता या घटना रोखण्यासंदर्भात ब्रिटन सरकारने लक्ष घालावे आणि मोदी सरकारला याबाबत सल्ला द्यावा अशी मागणी देखील अशवर्थ यांनी केली आहे.
मॉब लिचिंगच्या घटनांमध्ये 2014 पासून वाढ झाली आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर यावर रोख लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र जुन महिन्यात झारखंडमध्ये एका मुस्लिम युवकाला मॉब लिचिंगच्या घटनेत आपला जीव गमवावा लागला. तर नुकतेच तमिळानाडू राज्यात देखील एका मुस्लिम तरुणाला बीफ सुप प्यायले म्हणून मारहाण करण्यात आली. देशातील विरोधी पक्षातील नेत्यांकडून वारंवार अशा घटनांविरोधात आवाज उठवण्यात येतो आहे. मात्र अद्यापही सरकारकडून या घटना रोखण्यासाठी ठोस कृती करण्यात आली नाही. आता तर या घटनांबाबद आंतराष्ट्रीय न्युज चॅनेल्स, वर्तमानपत्रातून भारत सरकारवर टिका करण्यात येते आहे.