मुंबई बुहनजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यात लोकसभेच्या सर्व जागा लढवून संपुर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. त्यावेळी वंचितला निवडणूक आयोगाने कपबशी हे चिन्ह दिले होते. मात्र आता राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीला वंचितला या चिन्हाला मुकावे लागणार आहे. कारणा केंद्रीय निवडणूक आयोगाने आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाला हे चिन्ह प्रदान केले आहे. त्यामुळे वंचितला आता कोणते चिन्ह घेऊन लोकांसमोर जावे लागेल याकडे लक्ष लागलेले आहे.
यामुळे राहिले नाही चिन्ह
राज्यात लोकसभा निवडणूकीत वंचितने चांगली मतं पदरात पाडली. वंचितला राज्यात एकूण ७.२ टक्के टक्के मते मिळाली या पक्षाला राज्यस्तरीय नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्ष म्हणून मान्यता मिळवायची असल्यास पक्षाला ८ टक्के मतं मिळवणे आवश्यक असते. किंवा लोकसभेत २ खासदार किंवा १२ आमदार निवडून आल्यास ही मान्यता मिळू शकते. परंतु यापैकी काहीच वंचितला मिळाले नाही.
अशी मान्यता मनसेला मिळाली होती. २००९ साली मनसेचे रेल्वे इंजिन हे चिन्ह राखीव झाले होते. वंचितकडून इम्तियाज जलील देखील निवडून आले. परंतु ते एमआयएमच्या चिन्हावर निवडून आल्याने वंचित दोन्ही निकषांवर राज्यस्तरीय नोंदणीकृत पक्ष म्हणून मान्यता मिळवू शकलेला नाही. त्यामुळे चिन्हासाठी पुन्हा आयोगाकडे जावे लागणार आहे.
तर बच्चू कडू यांनी कपबशी या चिन्हाची मागणी याआधीच निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यामुळे आयोगाच्या नियमाप्रमाणे हे चिन्ह त्यांच्या पक्षाला मिळाले. दरवेळी वेगळे चिन्ह घेऊन लोकांसमोर जाण्यास अडचण येते. लोकसभा निवडणूकीत वंचितने हे चिन्ह घरोघरी पोहोचवले होते. यावर बच्चू कडू म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा भाजपसोबत आघाडी करण्याचा आमचा विचार आहे. राज्यात आम्ही १० जागा लढविणार आहोत. राज्यातील २८८ जागांसाठी हे चिन्ह मिळाले असून कपबशी चिन्हावरच ही निवडणूक आम्ही लढवू.