नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरची किंमत वाढली असून याचा लाभ घेणाऱ्यांनी आता सिलेंडर न भरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्वयंपाक करण्यासाठी वापरण्यात येणारे लाकडेही महागली आहेत. उज्ज्वल योजनेत ९६ टक्के कुटुंबाना घरगुती गॅस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी लाकडाचा वापर करत असल्याचे दिसून येत आहेत. यामुळे सप्टेंबरमध्ये लाकडाच्या किंमतीत १० टक्क्यांनी वाढ नोंदवली असून सप्टेंबर अगोदर लाकडाचे दर घटले होते.
मागच्या काही दिवसांमध्ये घरगुती गॅसमध्ये २५ टक्के वाढ झाली असून दिल्लीत सध्या विनाअनुदानित सिलेंडर ८५९ रु. असून ऑगस्ट २०१९ मध्ये तो ५७५ रु. मिळत होता. फक्त सहा महिन्यातच सिलेंडरचे दर २८४ रु.नी वाढले असून सिलेंडरचे दर दिल्लीतील विधानसभा निवडणुकीनंतर वाढले आहेत. तर महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामधील निवडणुकीनंतर महिन्यातच घरगुती गॅसचे दर ७७ रु.नी वाढले.
२०१८ डिसेंबरपर्यंत देशातील ५.९२ कोटी कुटुंबाला उज्ज्वल योजनेअंतर्गत गॅस जोडणी दिली असून २०१९ जूनपर्यंत २४.६ टक्के कुटुंबांनी दुसऱ्या वेळी सिलेंडर रिफिल केलेला नाही. तर १८ टक्के कुटुंबांनी एक-दोनदाच सिलेंडर भरला आहे. ११.७ टक्के कुटुंबांनी तीनदा आणि ४६ टक्के कुटुंबांनी चार किंवा त्यापेक्षा जास्त वेळा सिलेंडर भरला आहे.
किती आहे सिलेंडर भरण्याची वारंवारिता
एकूण ५.९२ कोटी कुटुंब आहेत. त्यातील २४.६ टक्के कुटुंबांनी एकदाही सिलिंडर भरलेला नसून १७.९ टक्के कुटुंबांनी एकदा किंवा दोनदाच गॅस भरला आहे. ११.७ टक्के कुटुंबांनी तीनदा सिलिंडर भरला असून ४५.८ टक्के कुटुंबांनी चारपेक्षा जास्त वेळा भरला आहे.
एकदाही सिलेंडर भरला नाही-
मध्य प्रदेश ३२.७ टक्के
ओडिशा ३५.७ टक्के
आसाम ३६ टक्के
झारखंड ४३.७ टक्के
त्रिपुरा ४४.५ टक्के
छत्तीसगड ५२.३ टक्के
काय आहेत सिलेंडर न भरण्याची कारणे ?
उज्ज्वला योजनेचा लाभ न घेणाऱ्या कुटूंब वर्षाला ६.७ सिलेंडरचा उपयोग करत असून या योजनेचा लाभ घेणारी कुटुंबे सरासरी ३ सिलेंडरचा उपयोग करतात. या योजनेच्या लाभार्थ्यांना सिलेंडर उपलब्ध होत असला तरी वाढलेला खर्च त्यांना पेलवत नाहीये. उज्ज्वला योजना मोफत असली तरी गॅस स्टोव्ह आणि रिफिलचा खर्च त्यांना द्यावा लागतो. गॅसची किंमत दिवसाला वाढत असून लाभार्थी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच अनुदानाची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यात उशिरा पोहोचत असल्याने त्यांना फटका बसत आहे.