मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – पीक विमा कंपन्याचे मुंबईतील कार्यालय मागील पाच वर्षात उद्धव ठाकरे यांना दिसली नाहीत आता निवडणुकीच्या तोंडावरच कशी दिसतात, असा टोला विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना लगावला आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकर्यांना मिळावा यासाठी शिवसेनेने राज्यभर मदत केंद्रे सुरू केली आहेत. या पार्श्वभुमीवर औरंगाबाद येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी विमा कंपन्यांच्या एजंटनी शेतकऱ्यांना लुटलं आहे.
समोरच्याला जी भाषा कळते त्याच भाषेत आम्ही उत्तर देणार. तुमची ऑफिसेस मुंबईत आहे, शेतकऱ्याला नडाल तर तुमची दुकाने बंद करून टाकू, असा इशारा दिला होता. शेतकरी कर्जमाफी, पंतप्रधान पीकविमा योजना यांसह राज्य व केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजना या चांगल्या असल्या तरी फसव्या यंत्रणेमुळे त्यांचा शेतकर्यांना लाभ मिळालेला नाही. येत्या आठ दिवसांत ही सर्व प्रकरणे निकाली निघाली नाहीत, शेतकर्यांना न्याय मिळाला नाही, तर आपण स्वतः शेतकर्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊ आणि शेतकर्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडून न्याय मिळवून देऊ, अशी ग्वाही देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या सभेत दिली होती.
उद्धव ठाकरेंनी विमा कंपन्यांना दिलेल्या इशारा विषयी बोलताना मुंडे म्हणाले की, मागील पाच वर्षापासून पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूटत आहेत. तेंव्हा उद्धव यांना कधी त्यांची मुंबईतील कार्यालये दिसली नाहीत. शिवसेनला निवडणुकीच्या तोंडावरच शेतकऱ्यांची आणि त्यांची लुट करणाऱ्या पीक विमा कंपन्यांची आठवण येते. उद्धवजी शेतकऱ्यांना इतकही भोळं समजू नका. छत्रपती शिवरायांच्या नावाने निवडणुका जिंकतात आणि त्याच छत्रपतींच्या नावाने कर्जमाफी योजना आणून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. आता पुन्हा शिवशाही सरकार म्हणून शिवरायांच्या नावाचा निवडणूकिसाठी वापर करत असल्याचा टोला उद्धव ठाकरेंसोबत भाजप सरकारला मुंडे यांनी लागवला.