परभणी : बहुजननामा ऑनलाइन : राष्ट्रवादीच्या सभेमध्ये यापुढे ‘शिवरायांचा भगवा ‘ आणि ‘राष्ट्रवादीचा झेंडा ‘ असे दोन झेंडे असतील, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. पाथरी येथील सभेत त्यांनी हि घोषणा केली आहे. ‘हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत नाही, त्यामुळे पीक विमा मिळत नाही. मुख्यमंत्री हमीभाव कधी देणार आहेत ? का म्हणून तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करत आहात ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सरकारला केला.
मराठवाड्याला पाच वर्षात सरकारकडून शेतीसाठी काय मिळाले ? आता तरी ताक फुंकून प्या. सावध राहा. आमचं सरकार निवडून द्या चार महिन्यात तुमचा सातबारा कोरा करून देतो. नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही, असे आव्हान पवारांनी केलं .
घटनेने आम्हाला अधिकार दिला आहे तरी तुम्ही आमचे तोंड दाबण्याचा प्रयत्न करत आहात. पाच वर्षात मी ‘त्या ‘ बँकेत कमिटीच्या मीटिंगला गेलो नाही. माझा त्यात काहीच संबंध नाही. निवडणूक जवळ आली कि, आलेच हे आदेश आणि नोटीसा द्यायला . कायदा सर्वाना समान हवा, परंतु ज्या पद्धतीने तुम्ही तुम्ही राजकारण करत आहात , ते बरोबर नाही अशी टीका अजित पवार यांनी भाजप सरकारवर केली. तसेच येत्या निवडणुकीत मतदान करताना शंभरवेळा विचार करा आणि आघाडीचे सरकार आणा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.